महाराष्ट्र

BJP : अकोला पश्चिममध्ये भाजपाला नव्या तेजाची गरज

Akola : कमजोर झालेल्या किल्ल्याला कणखर सेनापती हवा

Share:

Author

अकोला पश्चिममध्ये भाजप नेतृत्वविहीनतेच्या वावटळीत सापडला असून, गटबाजीने पक्षसंघटनेची मुळे कमकुवत केली आहेत. आता नव्या विश्वासार्ह चेहऱ्याचा शोध भाजपसाठी केवळ गरज नाही, तर अस्तित्वाची लढाई ठरली आहे.

एक काळ होता, जेव्हा अकोला पश्चिम म्हणजे भाजपचा बालेकिल्ला होता. पण आता या बालेकिल्ल्यातील भिंती झिजल्या आहेत. अंतर्गत भिंतींवर गटबाजीची भेग पडली आहे आणि छतावरून लोकशाहीचा विश्वास गळून पडत आहे. ज्या मतदारसंघात नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचा प्रभावदेखील पुरेसा ठरला नाही, तिथे भाजपसमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे नवीन आणि विश्वासार्ह नेतृत्व कोण?

दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा ऊर्फ लालाजी यांच्या स्मृती आजही अकोल्याच्या रस्त्यांवर जिवंत आहेत. त्यांनी मतदारांशी जोडलेलं नातं इतकं खोल होतं की त्यांचा उल्लेख अजूनही आदराने होतो. पण त्या पाठीमागे आता भाजपमध्ये नेतृत्वाचा शून्य पसरला आहे. ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीत चुकीचा उमेदवार दिला गेला, त्यामागे आर्थिक व्यवहार, अंतर्गत खेळी, आणि वरचढ नेतृत्व टाळण्याचा कट होते, असा थेट आरोप कार्यकर्त्यांकडून होतो आहे.

गटबाजीचं विष

भाजपमधील काही वरिष्ठ नेत्यांना त्यांच्यापेक्षा प्रभावी चेहरा तयार होऊ नये, अशी भीती आहे. त्यामुळे विधानसभेसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीत पक्षाच्या संभाव्य उमेदवारांचा पत्ता कट करण्यात आला. याचे जिवंत उदाहरण म्हणजे मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे, ज्यांना तब्बल शेवटच्या क्षणापर्यंत वेटिंगवर ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे, अकोला शहरातील दुसरे महत्त्वाचे आमदार वसंत खंडेलवाल यांच्यावरही ‘फिल्डिंग’ लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. दोन कार्यक्षम आमदारांना बाजूला सारून भाजपमधील काही मंडळींनी पक्षाच्या हिताऐवजी वैयक्तिक गणितांना महत्त्व दिलं, असं कार्यकर्त्यांचं स्पष्ट मत आहे.

अकोल्यात भाजपने अकोला पश्चिम वगळता इतर तीन विधानसभा मतदारसंघांतील परंपरा जपली असली, तरी आता त्याच परंपरेचा बुरखा अकोला पश्चिमला झाकू शकणार नाही. महापालिका निवडणूक ही भाजपसाठी आत्मपरीक्षणाची अंतिम संधी आहे. जर याही निवडणुकीत ‘आपल्यामधलाच आपल्याला हरवतो’ ही मानसिकता चालू राहिली, तर काँग्रेससारखे पक्ष त्याचा फायदा घेतील, यात शंका नाही. जी चूक भाजपने विधानसभा निवडणुकीत केली, तीच चूक पुन्हा घडवली तर भाजपाचे ते मोठे नुकसान असणार, असे बोलले जात आहे.

कार्यकर्त्यांच्या मनात उठलेली धग

‘व्हीआयपी संस्कृती’, ‘मिळालेल्यांना विशेष संधी’, ‘जुने कार्यकर्ते उपेक्षित’ हे सगळं आता कार्यकर्त्यांच्या मनात खोलवर साठलं आहे. एका वरिष्ठ नेत्याच्या पाठिंब्याचा हवाला देत एका नेत्याने कार्यकर्त्यांवर दबाव आणण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. पैशाच्या, ओळखीच्या जोरावर उमेदवारी मिळवण्याचे आरोप उघडपणे कार्यकर्त्यांकडून केले जात आहेत.

या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मात्र संधी साधताना दिसते. काही हिंदू मतदार देखील भाजपच्या आतल्या संघर्षामुळे काँग्रेसकडे झुकत असल्याचं निरीक्षण आहे. जर गटबाजी, ईर्ष्या आणि व्यक्तिपूजेपेक्षा पक्षसंघटना आणि नवे नेतृत्व याकडे लक्ष केंद्रित केलं नाही, तर महापालिकेत भाजपला मोठं नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे.

अकोला पश्चिममधील पराभव ही एक निवडणूक नव्हे, तर भाजपसाठी आत्मपरीक्षणाची घंटा आहे. पक्षाला आता असा नेता उभा करावा लागेल, जो केवळ संघाचा नव्हे, तर सामान्य मतदारांचाही आवाज बनेल. हे नेतृत्व कुणाचं असेल? कोण असेल तो चेहरा जो लालाजी यांच्यासारख्या नेतृत्वाची परंपरा पुढे नेईल, आणि पक्षाला अंधारातून प्रकाशात घेऊन जाईल? हा शोध अजून सुरू आहे आणि वेळ निघून जाण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!