महाराष्ट्र

Rahul Gandhi : महाराष्ट्रात झाली मॅच फिक्सिंग, गांधींनी मांडली स्क्रिप्ट 

Maharashtra : विधानसभा निवडणुकीवरून काँग्रेसचा सरकारवर पुन्हा हल्लाबोल 

Author

राहुल गांधींनी 2024 महाराष्ट्र निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर हेराफेरी झाल्याचा ठोस आरोप करत निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. लेखातून त्यांनी आकडेवारीसह घडलेल्या कथित घोटाळ्याचं धक्कादायक विश्लेषण मांडलं.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ले करत आहे. आता काँग्रेसने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा मुद्दा पुन्हा उखडून काढला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचा आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. गांधी यांनी एक विशेष लेख लिहिला, त्या लेखात त्यांनी सरकारवर आरोपांचा भडीमार केला आहे. ही फक्त किरकोळ अनियमितता नाही, तर राष्ट्रीय संस्थांवरच कब्जा करून लोकशाही व्यवस्थेची शुद्धपणे गळचेपी केल्याचा गंभीर ठपका त्यांनी सरकारवर ठेवला आहे.

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, 2024 मध्ये झालेली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक केवळ विचित्र नव्हती, तर ती निवडणूक प्रक्रिया आणि आकडेवारी यांच्यातील अस्वाभाविक विसंगतीमुळे संशयास्पद ठरते. त्यांच्या मते, या निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदानाच्या टक्केवारीत वाढ झालेली दाखवण्यात आली की, ती आकडेवारीच निवडणुकीची पारदर्शकता आणि निष्ठावानतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. त्यांनी आकडेवारीचा संदर्भ देताना सांगितले की, 2024 मध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंतची प्रोव्हिजनल मतदान टक्केवारी 58.22 होती. तर दुसऱ्या दिवशी जाहीर करण्यात आलेली अंतिम टक्केवारी 66.05 इतकी होती. म्हणजेच एकाच रात्रीत 7.83 टक्क्यांनी म्हणजेच जवळपास 76 लाख मतांनी वाढ झाली.

अम्पायर ठरवण्याचा अधिकार

राहुल गांधी यांनी यामागचा संपूर्ण ‘स्टेप-बाय-स्टेप’ कथित घोटाळा मांडताना, पाच टप्प्यांत संपूर्ण हेराफेरीचं विश्लेषण केलं आहे. पहिला टप्पा होता निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेतील फेरफार. 2023 मध्ये केंद्र सरकारने सरन्यायाधीशांऐवजी कॅबिनेट मंत्री निवड समितीत घालून निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीत बहुमताचा वापर करून अम्पायर ठरवण्याचा अधिकार आपल्याकडे घेतल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरा टप्पा म्हणजे बोगस मतदारांची भर. राहुल गांधी म्हणतात, पाच वर्षांत मतदारसंख्येत 31 लाखांची वाढ झाली असताना, अवघ्या पाच महिन्यांत 41 लाख नवमतदारांची भर कशी काय पडते? एवढी मतदारसंख्या राज्याच्या प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त कशी होते?

Prakash Ambedkar : गोळ्या संपल्या त्यांच्या, पण संधी दवडली आपण 

चमत्कारिक वाढ

तिसऱ्या टप्प्यात त्यांनी मतदानाच्या टक्केवारीतील वाढीव आकडेवारीवर बोट ठेवले. बहुतेक केंद्रांवर सामान्य मतदान वातावरण असताना, एकाच रात्रीत लाखो मतांची भर पडणे, हे शक्यच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चौथ्या टप्प्यात त्यांनी थेट आरोप केला की, ही वाढ केवळ 12 हजार मतदान केंद्रांपुरतीच मर्यादित होती. तीही अशा जागांवर जिथे भाजपने मागील लोकसभा निवडणुकीत खराब कामगिरी केली होती. या केंद्रांवर भाजपने अचानक चमत्कारिक वाढ नोंदवली. राहुल गांधी यांनी कामठी विधानसभा मतदारसंघाचं उदाहरण देत स्पष्ट केलं की, काँग्रेसच्या मतांची संख्या सारखी असताना भाजपची मते एकाच निवडणुकीत 56 हजारांनी वाढली. ही वाढ इतकी अनैसर्गिक होती की, भाजपला जणू ‘ब्रॅडमन’ची कामगिरी मिळाल्याचा उपरोध त्यांनी केला.

नियमांमध्ये सुधारणा

पाचव्या टप्प्यात त्यांनी दावा केला की, निवडणूक आयोगाने सर्व पुरावे लपवण्यासाठी अनेक पावलं उचलली. व्हिडिओ फुटेज आणि सीसीटीव्ही रेकॉर्ड्स मिळू नयेत म्हणून निवडणूक नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली. याशिवाय, डुप्लिकेट EPIC क्रमांक, हटवलेले नावं, व बदललेली केंद्रं, हे सर्व गोष्टी एक मोठा हेराफेरीचा संकेत देत असल्याचे त्यांनी नमूद केले. या संपूर्ण प्रक्रियेवर रोष व्यक्त करत राहुल गांधी म्हणतात की, मॅच फिक्स करून निवडणूक जिंकणे शक्य असले तरी, लोकशाहीवरील विश्वास गमावला जातो. लोकशाहीसाठी ही निवडणूक म्हणजे विष. निवडणूक आयोगाच्या मौनाने आणि सरकारच्या अनुलक्षेने या शंकेला आणखी धार चढली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!