
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होताच राजकीय वातावरण तापले आहे. विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करत निवडणुकीतील गडबडीचे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आणले आहेत.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसने सत्ताधाऱ्यांविरुद्ध आक्रमक मोर्चा उघडला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील कथित गडबडीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विशेष लेखातून सत्ताधाऱ्यांवर थेट हेराफेरीचे आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. हा केवळ किरकोळ अनियमिततेचा प्रकार नाही. तर लोकशाही व्यवस्थेवरच गदा आणणाऱ्या गंभीर प्रकाराचे उदाहरण असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात नवा वादंग निर्माण झाला आहे. सत्ता आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

Harshwardhan Sapkal : आठ टक्क्यांची उडी संशयास्पद, आयोग मौन का?
संशयास्पद आकडेवारी
राहुल गांधींनी विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेतील गोंधळ उघडकीस आणत, ही निवडणूक ‘मॅच फिक्सिंग’ असल्याचा ठाम दावा केला आहे. त्यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीनंतर अचानक वाढलेली मतदारसंख्या, मतदान वेळ संपल्यानंतर अचानक उडी मारणारी मतदान टक्केवारी ही अत्यंत संशयास्पद बाब आहे. याबाबत बोलताना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना खुले आव्हान दिले.
दम असेल तर यावर खुलासा करा, असे म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी आरोप केला की, केंद्रीय निवडणूक आयुक्त निवडण्याची प्रक्रिया पारदर्शक नाही. शिवाय विविध सरकारी यंत्रणांच्या मदतीने ही निवडणूक जिंकण्याचा डाव रचण्यात आला. 2024 मधील विधानसभा निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यानंतर सरासरी 8.5 टक्के मतदान वाढले, ही बाब अत्यंत संशयास्पद आहे. महाराष्ट्रात बेकायदेशीर पद्धतीने सरकार स्थापन झाले असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.
ओबीसींना न्याय कधी
राज्यातील सत्तांतरासाठी आणखी एक मोठी राजकीय हालचाल रंगत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकत्र येण्याच्या चर्चांना सध्या वेग आला आहे.जर ठाकरे बंधू एकत्र येऊन महाराष्ट्रविरोधी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असतील, तर आम्ही त्याचे स्वागत करू, असे वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे सांगितले. सत्ताधाऱ्यांना या संभाव्य युतीची भीती का वाटते? अशा चर्चांनी सरकार अस्वस्थ का झाले आहे? या प्रश्नांची उत्तरे आता जनतेला हवी आहेत, असेही वडेट्टीवार यांनी ठणकावून सांगितले.
याशिवाय ओबीसी समाजाच्या प्रश्नावरही काँग्रेसने सरकारला घेरले आहे. राज्य सरकार सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांना समान निधी देत असल्याचा दावा करीत असले तरी, प्रत्यक्षात सारथीला इमारत आणि वसतिगृहासाठी अधिक निधी देऊन इतर संस्थांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
महाराष्ट्राची तिजोरी ओबीसी समाजासाठी नाही का? निवडणुकीत ओबीसी समाजाचे मत मागायचे आणि सत्तेत आल्यावर त्यांना डावलायचे. हा सरळ अन्याय आहे. सरकारने सर्व घटकांना समान न्याय व समान निधी द्यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली.