
राहुल गांधींनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत लेख लिहून संपूर्ण राज्यातलं वातावरण तापवलं आहे. त्यानंतर आता नाना पटोले यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
लोकशाहीचा आत्मा असलेल्या मतपेटीतच जर शंका निर्माण झाली, तर विजय कितीही प्रचंड असला, तरी जनतेच्या मनात संशयाची जखम होते. अशाच संशयाच्या सावल्या सध्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर दाटून आल्या आहेत. राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेवरून पुन्हा सरकारला झाल्यावर धरले. त्यानंतर आता काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक प्रक्रियेवर आणि निवडणूक आयोगाच्या भूमिका वर थेट प्रश्नांची सरबत्ती करत निवडणूक ‘दरोड्याचा’ आरोप केला आहे.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशानंतर अवघ्या पाच महिन्यांतच महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव होतो, हेच आश्चर्यकारक आहे. त्यातच, मतमोजणीत दाखवलेली टक्केवारीची वाढ हा खवळलेला वादाचा केंद्रबिंदू बनला आहे. पटोले म्हणाले, 5 वाजता 58.22 टक्के मतदान, रात्री 11:30 वाजता 65.02 टक्के, आणि दुसऱ्या दिवशी थेट 66.05 टक्के वाढते. एवढा मोठा फरक कुठून आणि कसा आला? ही 76 लाख मतांची वाढ म्हणजे सरळ मतांवर दरोडा.

Devendra Fadnavis : आत्मनिरीक्षण करण्याचा सल्ला; आरडाओरडा नको
घोटाळ्यांचे फुटेज
नाना पटोले यांनी चंदिगड महानगरपालिकेच्या निवडणुकीचे उदाहरण देत भाजपावर टीका केली. सीसीटीव्ही फुटेजमधून लोकांनी प्रत्यक्ष पाहिले आहे की मतपत्रिकांमध्ये फेरफार करून भाजपाला जिंकवले गेले. हीच स्क्रिप्ट आता महाराष्ट्रात साकारली जात आहे. वारणसीतही सुरुवातीला मोदी पिछाडीवर होते, नंतर सगळी ‘यंत्रणा’ राबली आणि निकाल बदलला, असा घणाघात करत पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं. भाजपा नेते का निवडणूक आयोगाचे वकील झाले आहेत? नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस आयोगाची बाजू लावून सांगतात, बावनकुळे देखील हेच करतात. मग आमचं म्हणणं कोणी ऐकायचं? निवडणूक आयोग की भाजपा आयोग? असा रोखठोक सवाल करत पटोले यांनी भाजप नेत्यांच्या भूमिका संशयास्पद असल्याचं सुचवलं.
मतदारयादीतील हेरफेरचे पुरावे
नाना पटोले यांनी शिर्डी मतदारसंघातील मतदारसंख्या वाढीवर थेट पुरावे असल्याचं जाहीर केलं. सात हजार बोगस मतदार कसे तयार झाले, याचे आम्ही पुरावे देऊ. अशा अनेक मतदारसंघात जिथे बोगस मतदार वाढवले, तिथेच भाजपाला तितक्याच मताधिक्याने विजय मिळतोय. ही एक ‘कॉपी-पेस्ट’ पद्धती आहे, असं म्हणत त्यांनी सुसंगत आकडेवारीसह निवडणुकीतील अपारदर्शकतेचा पत्ता लावल्याचा दावा केला. आमच्याकडे पुरावे आहेत, तुम्ही खोडून दाखवा, अशा आव्हानात्मक शब्दांत नाना पटोले यांनी भाजप नेत्यांना जाहीर द्वंद्वात उतरवलं. वायफळ बडबड थांबवा आणि राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले मुद्दे पुराव्यानिशी फेटाळा, असे म्हणत त्यांनी संपूर्ण वातावरण तापवलं. पटोलेंनी पुन्हा एकदा मतांची विश्वासार्हता आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता यांचं पुनरावलोकन करण्याची गरज अधोरेखित केली.
या गंभीर आरोपांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. लोकशाहीचे मंदिर समजल्या जाणाऱ्या निवडणुकांवर जर नागरिकांचा विश्वासच डळमळीत झाला, तर हे संपूर्ण व्यवस्थेवरच मोठे संकट आहे. आता सगळ्यांच्या नजरा केंद्र सरकार, भाजप, आणि निवडणूक आयोगाच्या प्रतिक्रियेवर खिळल्या आहेत. या स्फोटक आरोपांना उत्तर मिळणार की पुन्हा एकदा शांततेच्या नावाखाली सर्व काही झाकून टाकलं जाणार?