
महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जनतेच्या मतांवर संशयाची सावली गडद झाली आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी ही निवडणूक नव्हे, तर लोकशाहीचा योजनाबद्ध खून असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लेखाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी थेट निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत तीव्र शब्दांत सत्ताधाऱ्यांवर आणि निवडणूक यंत्रणांवर हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचा पराभव झाला नाही, तर तिचा निर्घृण खून करण्यात आला आहे, असे वक्तव्य त्यांनी करून राजकीय वातावरण तापवले आहे.
चेन्नीथला यांनी स्पष्ट केले की राहुल गांधी यांनी मांडलेले सत्य हे फक्त एक राजकीय लेख नाही, तर भारतीय लोकशाहीवर नियोजितरित्या केलेल्या आघाताचा दस्तऐवज आहे. लोकशाही संस्था ताब्यात घेऊन, तिचा वापर सत्तेच्या फायद्यासाठी केला गेला. जनमताची चोरी, कपट आणि फसवणूक याच्याद्वारे महाराष्ट्रातील निवडणूक खेळवण्यात आली, असा घणाघात त्यांनी केला.

पराभव न पचणारा
चेन्नीथला पुढे म्हणाले की, 2024 मध्ये मी महाराष्ट्राचे प्रभारीपद स्वीकारले आणि लोकसभेत काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीने मोदी लाटेला रोखून भाजपचा पराभव केला. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील हा पराभवच त्यांच्या पूर्ण बहुमताच्या मार्गातील अडथळा ठरला. पण अवघ्या सहा महिन्यांत काय घडले की महाविकास आघाडी 170 जागांपासून थेट 50 जागांवर आली? ही कोणत्याही विचार करणाऱ्या माणसाला पचणारी गोष्ट नाही.
चेन्नीथला यांचा सवाल आहे की, ज्या नेत्यांवर विश्वासघात, गद्दारी आणि संधीसाधूपणाचे आरोप आहेत, त्याच मंडळींनी इतका जबरदस्त विजय कसा मिळवला? ते म्हणतात, ही सहज घडलेली गोष्ट नाही, तर ही निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाहीवर केलेली पूर्वनियोजित आणि योजनाबद्ध घाव होती.
Devendra Fadnavis : आत्मनिरीक्षण करण्याचा सल्ला; आरडाओरडा नको
मतदारांची वाढली संख्या
ते आकडेवारीच्या माध्यमातून आपली भूमिका ठामपणे मांडतात. 2019 मध्ये महाराष्ट्रात 8.98 कोटी मतदार होते. 2024 मध्ये पाच वर्षांत नैसर्गिक वाढ होऊन ही संख्या 9.29 कोटी झाली, म्हणजे केवळ 31 लाखांची वाढ. पण विधानसभेच्या निवडणुकीआधी अवघ्या पाच महिन्यांतच मतदारांची संख्या 41 लाखांनी वाढून 9.70 कोटी कशी झाली? महाराष्ट्रात प्रौढांची एकूण लोकसंख्या 9.54 कोटी असूनसुद्धा मतदार मात्र 9.70 कोटी कसे असू शकतात? हा निव्वळ आकड्यांचा खेळ नाही, तर जनमताच्या लूटमारचा भयानक नमुना आहे.
याचबरोबर मतदानाच्या आकडेवारीवरही त्यांनी संशय व्यक्त केला. मतदानाच्या दिवशी 58.22 टक्के मतदान झाले होते. कुठेही मोठ्या रांगा नव्हत्या, ना उशिरापर्यंत मतदान झाले. मग रात्री एकाच झटक्यात 66.05 टक्के अंतिम टक्केवारी कशी झाली? म्हणजेच सायंकाळनंतर तब्बल 76 लाख मतदारांनी मतदान केले. हे शक्य आहे का? याला जनमताची चोरी म्हणायचं नाही तर काय?
आयोगाने द्यावे स्पष्टीकरण
राहुल गांधींनी या विषयाला लेखरूपात मांडले असले तरी त्यामागे एक खोल सत्य दडले आहे, असं सांगत चेन्नीथला यांनी या कटाचा पर्दाफाश केला. ही लढाई फक्त महाराष्ट्रापुरती नाही. ही लढाई लोकशाहीच्या अस्तित्वाची आहे. निवडणूक आयोगाने जनतेपुढे स्पष्टीकरण द्यायला हवे. काँग्रेस पक्ष जनतेसोबत खंबीरपणे उभा आहे आणि आम्ही ही लढाई रस्त्यावर उतरूनही लढू, असा इशारा त्यांनी दिला.
शेवटी चेन्नीथला यांनी जनतेला सजग राहण्याचे आवाहन केले. आपण जर या निवडणूक फसवणुकीकडे डोळेझाक केली, तर आपल्या हातून उरलेलेही स्वातंत्र्य निसटून जाईल. म्हणूनच आता प्रत्येक नागरिकाने सावध राहून माहितीवर बारीक नजर ठेवली पाहिजे. कारण ही लढाई आता आपल्या अधिकारांची आहे, आपल्या भविष्याची आहे.