
राजकारणाच्या रंगमंचावर ‘ठाकरे बंधू’ पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरत आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीला बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना मी नाही, असा ठळक नकार दिला आहे.
राजकारणाच्या रंगमंचावर पुन्हा एकदा ‘ठाकरे बंधू’ एकत्र येणार का, हा प्रश्न पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. एकीकडे शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या संभाव्य युतीच्या चर्चा जोरात रंगताना दिसत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र यावर एकदम मोकळं मत नोंदवत, ही बेगानी शादी आहे, आणि त्यात अब्दुल्ला बनण्याचा माझा काही हेतू नाही, अशी ठसठशीत प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे संभाव्य युतीची चिन्हं दिसत असताना, या चर्चांना आणखी गती मिळाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मातोश्रीवर झालेल्या गुप्त बैठकीचा उल्लेख करत, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात एकत्र येण्याची बैठक झाली आहे. उद्धवजी तयार आहेत. आम्ही हात पुढे केला आहे, आता राज ठाकरे टाळी देतात का ते पाहायचं, असं खळबळजनक विधान केलं. या बैठकीसाठी अनिल परब यांच्यावर समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. दोघांमध्ये संवाद सुरू आहे, असा दावा देखील खैरे यांनी केला आहे.

फडणवीसांचा संयत टोला
या पार्श्वभूमीवर माध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता, त्यांनी अत्यंत संतुलित आणि मिश्किल भाषेत प्रतिक्रिया दिली. हे दोन पक्ष आहेत, भाऊ आहेत, काका-पुतणे आहेत. त्यांचं त्यांना ठरवू द्या. ठरल्यावर आमचं मत विचाराल तेव्हा उत्तर देईन. पण आत्ता मी बेगानी शादी में अब्दुल्ला बनणार नाही, असे त्यांनी हसत हसत स्पष्ट केले. या चर्चांमध्ये माध्यमांचीच जास्त उत्सुकता वाटते, प्रत्यक्षात त्यांच्या संवादाबाबत काही सांगता येत नाही, असे फडणवीस म्हणाले.
शिवसेनेतील एकतेचा सूर
राज-उद्धव युतीची चर्चा सुरू असतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) मधूनही सकारात्मक सूर उमटत आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं, “राज व उद्धव यांचं एकत्र येणं ही काळाची गरज आहे. शिवसेनेच्या लाखो शिवसैनिकांची भावना हीच आहे की पुन्हा एक अखंड शिवसेना व्हावी. फक्त हे दोन बंधूच नाही, तर शिंदे साहेबांनीही या प्रयत्नात सहभागी व्हावं. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार एकत्र येऊन पुढे न्यायला हवेत.
Harish Pimple : देवा भाऊंच्या जंगी स्वागतासाठी आमदार झाले सज्ज
राजकीय भूकंपाची तयारी?
शिवसेनेच्या विभाजनानंतर उडालेला गोंधळ, मनसेच्या मरगळलेल्या वाटचालीत पुन्हा जोम आणण्याचा प्रयत्न आणि ठाकरे गटाचा ‘क्लीन इमेज’ राखण्याचा प्रयत्न. या तिन्ही धाग्यांना एकत्र जोडून राज आणि उद्धव यांच्या युतीची शक्यता आज पुन्हा जिवंत झाली आहे. या संभाव्य युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटावर मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजप, शिंदे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (दोन्ही) यांच्या राजकारणावर याचा थेट परिणाम होणार हे स्पष्ट आहे.
राजकारणात ‘कधीच न म्हणू नका’ हे सूत्र कायमच लागू होतं. जे खूप दूर गेले, ते एका भेटीने जवळही येऊ शकतात. राज आणि उद्धव दोघांचाही रक्तात शिवसेना आहे. दोघंही बाळासाहेबांचे वारसदार असल्याचा दावा करतात. आता हे दोन प्रवाह एकत्र आले, तर महाराष्ट्रात राजकारणाची नवी समीकरणं तयार होतील, यात शंका नाही.