महाराष्ट्र

Devendra Fadnavis : शेतकऱ्याच्या हातात सौरशक्तीचा लगाम 

Farmers : मातीच्या ओंजळीत उतरली सूर्यकिरणांची क्रांती 

Author

शेतकऱ्यांच्या भविष्यात आता सूर्यप्रकाशाची नवी दिशा मिळणार आहे. राज्यात एक हजार 71मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारून तीन लाख शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज दिली जाणार आहे.

राज्याच्या विकासनकाशावर आता नव्या ऊर्जा किरणांची लहर उमटणार आहे. पारंपरिक वीजेच्या सावलीत अडकलेल्या शेतीला सूर्यप्रकाशाच्या नव्या उजेडात नेण्यासाठी ‘महानिर्मिती’च्या एक हजार 71 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पांची घोषणा झाली आहे. यातून राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांच्या आयुष्याला अक्षरशः ‘ऊर्जायुक्त’ दिशा मिळणार आहे.

राज्यातील ऊर्जानिर्मिती क्षेत्रात नवा इतिहास रचत, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत, ‘महानिर्मिती’ या कंपनीने विकेंद्रित सौर प्रकल्पांची आखणी सुरू केली आहे. 0.5 मेगावॅट ते 25 मेगावॅट क्षमतेचे हे प्रकल्प शेतीच्या गरजेनुसार थेट उपकेंद्रांच्या पाच ते दहा किलोमीटर परिसरात उभारले जातील, म्हणजे आता शेतकऱ्यांना दिवसा भरपूर, अखंडित आणि स्वस्त वीज मिळणार.

वीज आता थेट सूर्यकिरणांतून

‘मिशन 2025’ अंतर्गत राज्यातील 30 टक्के कृषी फीडर्स सोलरायझ करण्याचं लक्ष्य ठरवण्यात आलं आहे. यामुळे शेतकऱ्यांची सेवा वीजखर्चात लक्षणीय कपात होणार असून, त्यांचं आर्थिक स्वावलंबन वाढणार आहे. दिवसा वीज मिळाल्यामुळे पिकांची उत्पादनक्षमता वाढणार, पाण्याचं योग्य नियोजन होणार आणि शेतकऱ्याचं जीवन अधिक समृद्ध होणार आहे.

या प्रकल्पाला GEAPP India (ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट) कडून डिजिटल पायाभूत सुविधा, मॉनिटरिंग, डॅशबोर्ड, आणि व्यवस्थापनासाठी तांत्रिक सहाय्य दिलं जात आहे. रॉकफेलर, IKEA Foundation आणि Bezos Earth Fund यांच्या सहकार्याने कार्यरत असलेल्या या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहभागामुळे सौर प्रकल्पांना जागतिक दर्जाचे बळ मिळणार आहे.

Nagpur Police : व्यसनमुक्त समाजासाठी निर्धार

एकत्रित सूत्रं

प्रकल्प पूर्णत्वासाठी एक धोरणात्मक संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार आहे, जी जमीन संपादनापासून प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीपर्यंतची प्रगती सेंट्रल डॅशबोर्डद्वारे पाहणार आहे. प्रत्येक सहभागधारकाला या डॅशबोर्डवर प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या पारदर्शक व्यवस्थेमुळे वेळेत आणि दर्जेदार कामकाज सुनिश्चित होणार आहे.

या सौर प्रकल्पांमुळे स्थानीय युवकांसाठी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. प्रकल्प व्यवस्थापन, देखरेख, स्थापत्य, निगा, आणि डिजिटल प्रणाली संचालन यात नव्या संधी उभ्या राहणार आहेत. ऊर्जेचा असा वापर जो केवळ वीज देणार नाही, तर एक शाश्वत कृषीक्रांती घडवणार आहे. कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरण संरक्षणाचाही दुहेरी लाभ मिळणार आहे. ऊर्जेच्या या नवदिशेने शेतकऱ्यांच्या भविष्यात दिवसा विजेसोबत आशाही चमकणार आहे. हा प्रकल्प केवळ वीज उत्पादनाचा नाही, तर तो शाश्वततेचा, विश्वासाचा आणि विकासाचा प्रकल्प आहे. तीन लाख शेतकऱ्यांसाठी तो जगण्याची ऊर्जा ठरणार आहे. महाराष्ट्राच्या मातीतून आता सौर क्रांतीचा नवा उदय होतोय.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!