प्रशासन

Shalartha Scam : ओंकार अंजीकरच्या शिक्षण रॅकेटवर एसआयटीचा घाला

Nagpur : जय हिंद विद्यालयासह तिन्ही शाळांवर कारवाई

Author

राज्यात शालार्थ आयडीच्या बनावट घोटाळ्यात 2019 ते 2025 दरम्यान 1 हजार 56 बनावट शिक्षकांची नियुक्ती झाल्याचे उघड झाले. या प्रकरणात नागपूरच्या शाळा संचालकासह अनेक शिक्षण विभागातील अधिकारी एसआयटीच्या रडारवर आहेत.

राज्यातील शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या एका भयंकर घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. शाळांमध्ये ज्ञान देण्यासाठी नेमले गेलेले शिक्षक खरे शिक्षकच नाहीत, हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. शालार्थ आयडीच्या बनावट वापरातून हजारो मुलांचे भविष्य काळोखात लोटणारी बोगस शिक्षक भरतीची भीषण साखळी उघडकीस आली आहे. 2019 ते 2025 या सहा वर्षांच्या काळात तब्बल 1 हजार 56 बनावट शिक्षक राज्यातील विविध शाळांमध्ये रुजू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शिक्षक भरतीसारख्या अतिसंवेदनशील प्रक्रियेत घडलेला हा प्रकार केवळ शिक्षण व्यवस्थेचाच नव्हे, तर संपूर्ण प्रशासनाच्या पारदर्शकतेवर मोठा काळा डाग ठरतोय.

बनावट कागदपत्रांची निर्मिती, बोगस शालार्थ आयडी, आणि या नकली शिक्षकांच्या पगारातून घेतले जाणारे कमिशन असा संपूर्ण काळा व्यवहार यामध्ये राबवला जात होता.  या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार म्हणून नागपूर येथील शांती निकेतन शैक्षणिक संस्थेचे संचालक ओंकार भाऊराव अंजीकर यांना अटक करण्यात आली आहे. विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने अंजीकर यांच्या तीन शाळांवर छापे टाकले आणि या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे आणि बोगस शालार्थ आयडी सापडले आहेत. तपासात उघड झाले की, अंजीकर यांनी फक्त स्वतःच्या शाळांपुरतेच हे जाळे विणले नाही, तर बाहेरच्या काही शिक्षकांनाही बनावट शालार्थ आयडी तयार करून दिले.

Akola : राज राजेश्वर मंदिर श्रेयवादाच्या धुळवडीत मदन भरगडांचा बॉम्ब 

लेटरहेड घोटाळ्याचा उलगडा

2019 पासून त्यांनी अंदाजे 30 शिक्षकांचे बनावट आयडी तयार केल्याचा ठपका आहे. एसआयटीच्या तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अंजीकर यांनी त्यांच्या संस्थेचे बनावट लेटरहेड वापरून अपात्र मुख्याध्यापक पराग पुडके यांना पद मिळवून दिले. शिक्षणात पारदर्शकतेच्या गप्पा मारणारे हे लोक स्वतः नियमांना हरताळ फासणारे निघाले. अंजीकर यांच्या शांती निकेतन शैक्षणिक संस्थेच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या जय हिंद उच्च प्राथमिक विद्यालयात छापा टाकून एसआयटीने महत्त्वाची कागदपत्रे आणि पुरावे जप्त केले. त्यात काही शिक्षकांचे शालार्थ आयडी पूर्णपणे बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे.

केवळ खासगी संस्थाचालकच नव्हे, तर शिक्षण खात्यातील काही अधिकारी आणि कर्मचारी देखील या भानगडीत अडकण्याची शक्यता आहे. पोलिस तपासात समोर येत आहे की, शिक्षणाधिकारी, क्लार्क, वेतन अधीक्षक यांच्याही संमतीने किंवा दुर्लक्षामुळे हे बनावट आयडी सहज मिळत होते. पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या माहितीनुसार, सध्या तपास सुरू असलेल्या प्रकरणात किमान 650 शिक्षकांची नियुक्ती बोगस असण्याची दाट शक्यता आहे. नियम पायदळी तुडवत, कोणतीही अधिकृत प्रक्रिया न करता शालार्थ आयडी वाटण्यात आले. यातून मुलांच्या भविष्याशी खेळ करणारा एक मोठा रॅकेट कार्यरत असल्याचे चित्र समोर येत आहे.

Yashomati Thakur : सरकारचा विकास कुणाच्या घरी पाणी भरतोय?

शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अशा प्रकारचा घोटाळा उघड होणे हा केवळ दुर्दैव नव्हे, तर समाजासाठी मोठा धक्का आहे. मुलांच्या हातात पुस्तक नव्हे, तर खोट्या शिक्षकांकडून भामटेपणाचा धडा दिला जात असेल तर शिक्षणाचे भविष्य किती सुरक्षित आहे, हा प्रश्न आता प्रत्येक पालकाच्या मनात निर्माण झाला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!