
राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात मराठी अस्मितेसाठी 5 जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा निघणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही यात एकत्र येणार आहेत.
राज्याच्या शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा मोठा भडका उडालाय. प्रश्न आहे शाळांमध्ये शिकवायची भाषा कोणती? वर्गखोल्यांपासून ते थेट विधानभवनापर्यंत या चर्चेची धग पोहोचली आहे. मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त निर्णयानुसार, महाराष्ट्रातील शाळांमध्ये ‘हिंदी’ ही तिसऱ्या भाषेच्या स्वरूपात अनिवार्य करण्याचा निर्णय नुकताच जाहीर झाला. मग काय, या निर्णयावरून मराठीप्रेमींमध्ये तीव्र संतापाचा उद्रेक झाला. हा निर्णय म्हणजे मराठीवर घाला नाही का, असा सवाल आता समाज मनात ठाण मांडून बसलाय.
वादाचा भडका इतका मोठा झाला की, आता मुंबईच्या रस्त्यांवर मराठीच्या अस्मितेसाठी भव्य मोर्चा निघणार आहे. विशेष म्हणजे, या मोर्चात शिवसेना उद्धव ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघेही खांद्याला खांदा लावून सहभागी होणार आहेत. वर्षानुवर्षे राजकारणात वेगवेगळ्या वाटांनी चाललेले ठाकरे बंधू मराठीच्या प्रश्नावर एकत्र येत आहेत, हे दृश्य नक्कीच ऐतिहासिक असणार आहे. या आंदोलनावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया देखील स्पष्ट झाली आहे. त्यांनी ठामपणे सांगितले की, महाराष्ट्रात हिंदीची सक्ती आम्ही मान्य करणार नाही.

Nitin Gadkari : आत्मनिर्भर भारतासाठी आर्थिक प्रगतीसह संस्कार आवश्यक
पक्षपाती झेंडा नको
वडेट्टीवार यांनी दोन्ही ठाकरे बंधूंनी जर हा मोर्चा कुठल्याही पक्षाच्या झेंड्याशिवाय, फक्त मराठीसाठी काढायचा निर्णय घेतला तर काँग्रेसची भूमिका सकारात्मक राहील, असेही स्पष्ट केले. वडेट्टीवार पुढे म्हणाले, दोन्ही भाऊ जर एका मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत असतील तर त्याचं स्वागतच आहे. हा मोर्चा पक्षीय राजकारणापेक्षा भाषेच्या अस्मितेसाठी असेल तर आम्ही नक्कीच सहभागी होण्याचा विचार करू. याच दरम्यान, वडेट्टीवार यांनी एक महत्त्वाचा खुलासाही केला. त्यांनी सांगितले की, कालच मला मनसेचे बाळा नांदगावकर यांचा फोन आला होता. त्यांनी मोर्चात सामील होण्याचे निमंत्रण दिले. यासोबतच राज ठाकरे यांचाही स्वतंत्र निरोप आला आहे.
आता मी माझ्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेईन. राज्यातील बहुसंख्य मराठी भाषिक संघटना, सामाजिक गट आणि अनेक राजकीय पक्ष पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधात उभे आहेत. या सर्व संतापाला आता रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय झाला आहे. 5 जुलै रोजी मुंबईच्या रस्त्यांवर मराठीच्या अस्मितेसाठी आणि हिंदी सक्तीच्या विरोधात भव्य मोर्चा होणार आहे. या आंदोलनात ठाकरे बंधू एकत्र येणं हे केवळ भाषेच्या प्रश्नापुरतं मर्यादित राहील का, की यामुळे राज्याच्या राजकारणात नवीन समीकरणं निर्माण होतील, हे पाहणं तितकंच उत्सुकतेचं आहे.
Akola Municipal Corporation : बनावट नागरिकत्वाचा डेंजर अलर्ट