
कौशल्याशिवाय प्रगती अशक्य, असा स्पष्ट संदेश देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिक्षक परिसंवादात नव्या शैक्षणिक धोरणाची दिशा स्पष्ट केली. रोजगाराभिमुख, मूल्याधारित शिक्षणाच्या गरजेवर त्यांनी ठामपणे भर दिला.
जग बदलते आहे, तंत्रज्ञान झपाट्याने बदलते आहे आणि त्यासोबतच मनुष्यबळाची गरजही बदलते आहे. आज केवळ पदवी असून चालत नाही, तर रोजगारक्षम कौशल्य असणे ही काळाची गरज आहे, असे परखड मत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नागपूरच्या रेशीमबागेतील कवीवर्य सुरेश भट सभागृहात ‘मंथन’ या संस्थेच्या वतीने आयोजित शिक्षक परिसंवादात गडकरी बोलत होते. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि मिश्किल शैलीतल्या भाषणाने उपस्थित शिक्षक, शैक्षणिक धोरणकर्ते आणि विद्यार्थ्यांमध्ये विचारांची नवी दिशा निर्माण झाली.
गडकरी म्हणाले, देशात सगळी साधनसंपत्ती, यंत्रणा, पायाभूत सुविधा मिळाल्या, तरीही जर प्रशिक्षित आणि योग्य मार्गदर्शन मिळालेलं मनुष्यबळ नसेल, तर प्रगतीचा रथ अडतो. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणात तांत्रिक, व्यवसायाभिमुख शिक्षण, रोजगाराभिमुख कौशल्य विकास यावर विशेष भर देण्यात आला आहे.

मागाल तेवढे वेतन
गडकरींनी आपल्या भाषणात कौशल्याचा खऱ्या अर्थाने गौरव करत सांगितले, आज उच्च शिक्षण घेतलेल्या प्राध्यापकांचे वेतन दोन लाख रुपये आहे. पण फक्त शैक्षणिक पात्रता असून चालत नाही. कौशल्य असेल तर कुठल्याही क्षेत्रात उत्तुंग यश मिळते. पण हे ऐकून लगेच आठव्या वेतन आयोगाची मागणी करू नका, अशी मिश्किल टिप्पणी करत त्यांनी हास्यकल्लोळ निर्माण केला.
या परिसंवादाला भाजपचे नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, ज्येष्ठ नेते संजय भेंडे, नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवरणकर, डॉ. श्रीपाद ढेकणे, माजी आमदार नागो गाणार, मोहित शाह व विष्णू चांगदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षणात मूल्यांची गुंफण हवी
नितीन गडकरी पुढे म्हणाले, आपल्याला जगातील तिसरी अर्थव्यवस्था व्हायचंय, आत्मनिर्भर भारत घडवायचा आहे आणि अखेरीस ‘विश्वगुरू’ बनायचंय. पण केवळ आर्थिक प्रगतीवर आपण हे साध्य करू शकत नाही. त्यासाठी आपल्या संस्कृतीचे, मूल्याधिष्ठित जीवनशैलीचे आणि परंपरेचे महत्त्वही तेवढेच आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की, शिक्षण हे फक्त गुणांच्या आकड्यापुरते मर्यादित नसावे. शिक्षण म्हणजे ज्ञान, कौशल्य आणि संस्कारांची त्रिसूत्री. आणि भविष्यातील समाज घडवायचा असेल, तर या त्रिसूत्रीवर आधारित शिक्षणव्यवस्था हवी.
Vijay Wadettiwar : ठाकरे बंधू एकत्र आले तर आम्हीही विचार करू
गडकरींनी आपल्या भाषणात भारतीयांना आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला देत म्हटले, आपल्याच देशात सर्व ज्ञान आहे, हा गर्व सोडावा लागेल. जगात अनेक देशांतून खूप काही शिकण्यासारखे आहे. संशोधन, प्रबोधन आणि प्रशिक्षण यांचा समतोल ठेवत आपल्याला नव्या शतकासाठी मनुष्यबळ घडवावे लागेल.
जागतिक दृष्टिकोन
शिक्षणात तंत्रज्ञानाचा समावेश आवश्यक असल्याचे नमूद करत गडकरी म्हणाले, आजच्या काळात डिजीटल शिक्षण हा पर्याय नसून आवश्यकता बनला आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा, उद्याच्या उद्योगजगतातील मागणी, आणि शिक्षण संस्थांनी दिलेले कौशल्य, या सगळ्यांचा समन्वय साधून शिक्षणव्यवस्था नव्याने रचावी लागेल.
गडकरींच्या या भाषणातून एक स्पष्ट संदेश मिळतो की, भविष्यातील भारत घडवायचा असेल, तर शिक्षण हा केवळ अभ्यासक्रम नव्हे, तर संस्कार, कौशल्य आणि मूल्यांचा संगम असावा लागेल. नव्या शैक्षणिक धोरणाने या दिशेने सुरुवात केली आहे, आता शिक्षणक्षेत्रातील प्रत्येक घटकाला त्या विचाराची खरीखुरी अंमलबजावणी करायची आहे. गडकरींच्या या विचारमंथनातून शिक्षक वर्ग, शैक्षणिक धोरणकर्ते आणि युवा विद्यार्थ्यांसाठी पुढील वाटचालीचा दिशादर्शक प्रकाशझोत मिळाल्याचे बोलले जात आहे.