महाराष्ट्र

Ajit Pawar : लहान मुलांचे डोके भाषेच्या ओझ्याखाली दाबू नका

Language War : मनसेच्या बॅनरवर झळकले अजित दादा

Author

महाराष्ट्रात शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ठाकरे बंधूंनी 5 जुलैला मोर्चाचे आयोजन केले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्राच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या प्रस्तावावरून राज्यात प्रचंड गदारोळ सुरू आहे. या निर्णयाला मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी विरोधाची लाट उसळली आहे. ‘हिंदी विरुद्ध मराठी’ असा स्पष्ट द्वंद्व उभं राहताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट आक्रमक भूमिका घेतली आहे. दोघेही येत्या 5 जुलैला मुंबईत भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणा झाली आहे. या मोर्चाची चर्चा गगनाला भिडत असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या सौम्य पण स्पष्ट भाषेत मोठं वक्तव्य केलं आहे.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी सांगितले की, हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चा काढण्याची वेळच येऊ नये, असा आमचा प्रयत्न आहे. त्यांनी सूचक इशारा दिला की चर्चा आणि संवादातून योग्य मार्ग निघू शकतो. अजित पवार पुढे म्हणाले, आज आमची कॅबिनेट बैठक आहे. यावर सखोल चर्चा होणार आहे. भाषेचा प्रश्न हा केवळ भावना भडकवणारा नसून, पालकांची देखील जबाबदारी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रत्येक पालकाला वाटतं की त्यांच्या मुलांनी जास्तीत जास्त भाषा शिकाव्यात. म्हणूनच इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये देखील मराठी सक्तीची केली आहे, असं त्यांनी नमूद केले.

Amravati : गणवेषाचा अभिमान रक्तात विरला; पोलिस अधिकाऱ्याची क्रूर हत्या

शिवसेना-मनसेची एकजूट

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, लहान मुलांना पहिलीतून तीन भाषा शिकायला लावणं योग्य नाही. पहिलीत इंग्रजी आणि मराठी शिकवावी, आणि हिंदीचं शिक्षण पाचवीपासून सुरू करावं. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांची लिपी देवनागरी असल्याने मराठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना हिंदी शिकणं फारसं कठीण राहत नाही.यात आणखी एक लक्षवेधी घडामोड म्हणजे, मनसेच्या बॅनरवर थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो झळकलेला दिसतो आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे मनसेने उभारलेल्या या पोस्टरवर अजित पवार यांना मोर्चात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं आहे.

विशेष म्हणजे या बॅनरवर अजित पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही छापण्यात आल्या आहेत. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांच्या पुढाकारातून हा बॅनर लावण्यात आला. बॅनरवर छापलेली अजित पवार यांची भूमिका थेट सरकारवरच सवाल करणारी होती. त्यामध्ये नमूद करण्यात आलं की, इयत्ता पाचवीपर्यंत मुलांनी मातृभाषेतच शिकावे. लहान वयात तीन भाषांचं ओझं टाकणं चुकीचं आहे. कोणत्याही भाषेला आमचा विरोध नाही, पण मराठी मुलांनी आधी आपल्या भाषेत निपुण व्हावं.अजित पवारांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे आता एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो.

Ravi Rana : मराठी अस्मितेचा मुखवटा फक्त वोटबँकेच्या अजेंडासाठी

महायुती सरकार ठाकरे बंधूंनी पुकारलेल्या मोर्चाच्या आधीच हिंदीच्या मुद्द्यावर काही सकारात्मक निर्णय घेणार का? की हा वाद आणखी चिघळणार? राजकारणात भाषेचा मुद्दा केवळ अस्मितेचा नसून, भविष्यातील शिक्षण आणि समाजाच्या मानसिकतेवर परिणाम करणारा ठरतो. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष महायुती सरकारच्या पावलाकडे लागलं आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!