नागपूरात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑपरेशन सिंदूरमधून मिळालेल्या तंत्रज्ञान धड्यावर भाष्य केले. त्यांनी युद्ध आता मिसाईल आणि ड्रोनच्या युगात आले व भारताला तंत्रज्ञानातूनच विश्वगुरूपदी नेता येईल, असा विश्वास व्यक्त केला.
लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर या दोन विषयांवरून प्रचंड गदारोळ झाला होता. विरोधकांनी या मोहिमेबाबत अनेक मुद्दे उपस्थित केले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन तासांच्या भाषणातून त्यावर प्रतिउत्तर दिले. मात्र, चर्चा अद्याप सुरू असतानाच नागपूरात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युद्धतंत्रज्ञानातील बदल आणि ऑपरेशन सिंदूरमधून घेतलेल्या धड्यांवर महत्त्वपूर्ण भाष्य केले.
राष्ट्र जागृती प्रतिष्ठानच्या वतीने वंदे मातरम राष्ट्रगीताच्या 150 वर्षपूर्ती निमित्त स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी सर्वच क्षेत्रात प्रगती आणि नवकल्पना आवश्यक आहेत. ऑपरेशन सिंदूरने एक गोष्ट स्पष्ट केली की, आता पारंपरिक रणगाडे आणि ट्रकवरील सैनिकी मोहिम संपल्या आहेत. युद्धाची दिशा पूर्णपणे तंत्रज्ञानाधारित झाली आहे. आज मिसाईल आणि ड्रोनच्या आधारेच रणांगणावर विजय मिळवला जातो. विशेष म्हणजे, या मोहिमेत वापरलेले ड्रोन नागपूरातील उद्योगपतींनी तयार केले असून हा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांच्या हातात भविष्य
गडकरींच्या मते, युद्धाची पद्धत आता पूर्णपणे बदलली आहे. मिसाईल, ड्रोन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारेच लष्करी मोहिमा पार पडत आहेत. त्यामुळे विज्ञान, तंत्रविज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांमध्ये भारताने वेगाने प्रगती करणे अत्यावश्यक आहे. या क्षेत्रातील आघाडी भविष्यातील जागतिक नेतृत्व ठरवेल आणि ज्याच्याकडे श्रेष्ठ तंत्रज्ञान असेल तोच खऱ्या अर्थाने विश्वगुरू बनेल. ऑपरेशन सिंदूरने हे वास्तव स्पष्ट केले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, भारताने जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था घडवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संशोधन, उद्योग, शिक्षण आणि नवकल्पना ही महत्त्वाची साधने ठरतील. यासाठी विद्यार्थ्यांनी आणि तरुण पिढीने तंत्रज्ञानात नवनवीन प्रयोग करून जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करावे.
कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांकडे पाहत गडकरी यांनी सांगितले की, भविष्यातील भारताची उभारणी हाच या तरुण पिढीचा संकल्प असावा. विज्ञान-तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवे शोध, नवे प्रकल्प आणि नवे उद्योग उभे करण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यांनी ज्ञानाच्या बळावर आणि नवकल्पनांच्या साहाय्याने देशाला आर्थिक आणि तांत्रिक सामर्थ्याच्या शिखरावर नेऊ शकते. गडकरींनी यावेळी देशभक्तीचा भाव जागवणाऱ्या ‘वंदे मातरम’ या गीताच्या 150 वर्षपूर्तीबाबतही गौरवोद्गार काढले. हे गीत आपले संस्कार आहे, देशभक्तीचा मंत्र आहे. देशाला एकत्र बांधून ठेवणारा प्रेरणास्त्रोत आहे. अशा ऐतिहासिक क्षणी हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या राष्ट्र जागृती प्रतिष्ठानचे त्यांनी मनापासून कौतुक केले.
Raj Thackeray : स्वातंत्र्य दिनी प्रजेच्या स्वातंत्र्यावर सरकारचा हल्ला
