2024 विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर 40 लाख मतांची चोरी केल्याचा गंभीर आरोप केला. या वादाचे प्रतिसाद भंडाऱ्यातही उमटले.
महाराष्ट्राच्या राजकीय रंगभूमीवर मत चोरीचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. 2024 विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीने सत्तेवर झेंडा रोवला. परंतु पराभवाचा धक्का अजूनही काँग्रेसला चटके देत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकताच भाजप आणि निवडणूक आयोगावर थेट आरोप केला की, निवडणुकीत तब्बल 40 लाख मतांची चोरी झाली. 7 ऑगस्ट 2025 रोजी दिलेल्या या वक्तव्याने दिल्लीपासून विदर्भापर्यंत राजकारणात खळबळ उडवली. राहुल गांधींनी केवळ आरोपच केले नाहीत, तर त्याचे पुरावेही सादर केले.
मत चोरीचा हा वाद केवळ महाराष्ट्रपुरता मर्यादित न राहता आता थेट केंद्राच्या गलियार्यांपर्यंत पोहोचला आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असून, राजकीय वातावरण तापले आहे. भाजपकडून प्रतिहल्ला होत असतानाच, काँग्रेस रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत आहे. या पार्श्वभूमीवर, पूर्व विदर्भातील काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी भंडाऱ्यात 14 ऑगस्ट रोजी एक भव्य कँडल मार्च काढला. ‘वोट चोर गद्दी सोड’ अशा आक्रमक घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. या मोर्च्यात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले.
निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह
डॉ. पडोळे यांनी राहुल गांधींच्या आरोपांना संपूर्ण पाठिंबा देत भाजपवर मोठ्या प्रमाणात मत चोरीचा गंभीर आरोप केला. कँडल मार्च केवळ निषेधापुरता मर्यादित नव्हता, तर तो जनतेत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न होता. मोर्चात सहभागी झालेल्यांच्या हातातील मेणबत्त्या आणि बॅनरवर निवडणूक पारदर्शकतेची मागणी स्पष्ट दिसत होती. काँग्रेसने स्पष्ट केले की, ही केवळ भंडाऱ्याची लढाई नाही, तर लोकशाहीच्या अस्तित्वाची लढाई आहे. राहुल गांधींच्या मते, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मतदार यादीत प्रचंड गोंधळ आहे. एकाच व्यक्तीची नावे अनेक ठिकाणी, फोटोंचा अभाव आणि बनावट पत्त्यांची नोंद यामुळे मतांची हेराफेरी झाली. त्याहून धक्कादायक म्हणजे, मतदान संपल्यानंतर सायंकाळी अचानक मतदानाच्या टक्केवारीत झालेली वाढ.
निवडणूक आयोगाने याचे स्पष्टीकरण द्यायलाच हवे, असा टोला त्यांनी लगावला. त्यांनी आणखी आरोप केला की, निवडणूक आयोगाने मतदारांचा इलेक्ट्रॉनिक डेटा काँग्रेसला देण्यास नकार दिला. सहा महिन्यांच्या तपासानंतर मिळालेल्या माहितीने धक्का बसल्याचे ते म्हणाले. शिवाय, मतदार यादीत वडिलांच्या नावांसमोर अनोखी चिन्हे दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले. मत चोरीचा हा वाद आता केवळ आरोप-प्रत्यारोपांच्या चौकटीत न राहता रस्त्यावर, संसदेत आणि लोकांच्या चर्चांमध्ये गाजत आहे. राहुल गांधींचे दावे, प्रशांत पडोळे यांचा भंडाऱ्यातील कॅन्डल मार्च आणि भाजपची भूमिका हे सगळे मिळून महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादळाची चाहूल देत आहेत. लोकशाहीची पारदर्शकता टिकवण्यासाठी ही लढाई पुढे किती तापते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Indian Politics : भाजपच्या आयटी सेलचे बनावट जाळे काँग्रेसने केले उध्वस्त
