महायुती सरकारचा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा नेहमीच चर्चेत असतो. पण यंदा या महामार्गावर एक विचित्र प्रकार घडल्याने प्रवाशांना चांगलाच धक्का बसला आहे.
महाराष्ट्राच्या गौरवशाली समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून एक विचित्र आणि गंभीर प्रकार घडत आहे. ज्याने प्रवाशांच्या मनात भीती आणि संताप निर्माण केला आहे. रात्रीच्या काळोखात, जेव्हा वाहनचालक या आधुनिक महामार्गावरून प्रवास करत होते. तेव्हा त्यांच्या गाड्यांच्या टायर्सना खिळ्यांनी टोचले गेले. काही गाड्यांचे टायर पंक्चर झाले, तर काहींचे थेट फुटले. संभाजीनगरच्या दौलताबाद परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. रस्त्यावर तब्बल शंभरहून अधिक खिळे ठोकले गेले. ज्यामुळे रात्री चार तासांसाठी हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागला.
वाहनचालकांनी संताप व्यक्त केला, तर सोशल मीडियावर या प्रकरणाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. सुरुवातीला, प्रवाशांनी या खिळ्यांमागे चोरट्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला. रस्त्यावर खिळे ठोकून वाहनचालकांना अडकवण्याचा आणि लुटमार करण्याचा डाव असावा, असे त्यांना वाटले. पण सत्य समोर येताच सर्वांनाच धक्का बसला. हे खिळे चोरट्यांनी नव्हे, तर महामार्गावरील पुलाच्या कामासाठी प्रशासनानेच ठोकले होते. पण यामागील बेजबाबदारपणा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे वाहनचालकांचा राग अनावर झाला. जर कामासाठी खिळे ठोकायचे होते, तर बॅरिकेड्स का लावले गेले नाहीत?
सोशल मीडियावर संताप
वाहनचालकांना आधीच सतर्क का केले गेले नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.या घटनेने राजकीय वातावरणही तापले आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. जनतेच्या पैशाने बांधलेला हा समृद्धी महामार्ग आता अपघातांचा महामार्ग बनला आहे, असा घणाघाती हल्ला त्यांनी चढवला. रात्रीच्या वेळी शेकडो गाड्यांचे टायर पंक्चर होणे ही केवळ दुर्घटना नसून, सरकारची निष्काळजी आणि नाकर्तेपणा आहे, असे सपकाळ म्हणाले. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, रस्त्यावर इतके खिळे पडलेले असताना पोलिस आणि प्रशासन काय करत होते?
मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ फक्त उद्घाटन सोहळ्यांपुरते मर्यादित आहे. प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास त्यांच्याकडे वेळ नाही, असे त्यांनी ठणकावले. सपकाळ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने या घटनेचा व्हिडीओ शेअर करत प्रशासनाच्या नाकर्तेपणावर बोट ठेवले. हा काही साधा प्रकार नाही, तर समाजकंटकांनी जीवाशी खेळण्याचा डाव रचला आहे, असे त्यांनी व्हिडीओत म्हटले. याबाबत आता प्रशासनाने खुलासा केला आहे. माळीवाडा इंटरचेंज, छत्रपती संभाजीनगर येथील दौलताबाद पोलिस स्टेशनच्या हद्दीत, समृद्धी महामार्गावर मेगा इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड कंपनीच्या हातात दुरुस्तीचे काम जोमात सुरू होते.
Sri Sri Ravishankar : नेपाळ उठावामागे आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा संशय
कामात 100 मीटरच्या परिसरात काँक्रीट रस्त्यावरील बारीक भेगांमध्ये ‘इपॉक्सी ग्राउटिंग’चा जादुई प्रयोग चालला होता, जिथे इंजेक्शनद्वारे मिश्रण भरण्यासाठी नोझल्स रस्त्यावर ठोकले गेले. पण, प्रवाशांच्या उतावीळपणाने बॅरिकेड्स उडवत गाड्या कामाच्या क्षेत्रात घुसल्या,आणि टायर्स पंक्चर होऊन वाहनचालकांची रात्र रणकंदनात गेली. महामार्ग प्रशासनाने खुलासा केला की, हा चोरीचा कट नव्हता, तर देखभालीचे काम होते. एमएसआरडीसीच्या देखरेखीखाली हे काम आता पूर्ण झाले असून, नोझल्स काढले गेले, वाहतूक सुरळीत झाली आणि पोलिसांनी जनजागृती करत सर्व गैरसमजांचा पडदा दूर केला.
