
बीड जिल्ह्यातील घटनेत राजकीय पातळीवर दोषी आढळल्यास ताबडतोब कारवाई करण्यात येईल. देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा चर्चा झाल्याचे अजित पवारांनी सांगितले.
बीड जिल्ह्याच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील आरोपींशी धनंजय मुंडे यांचा संबंध असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधकांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या कॅबिनेट मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत भाष्य केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार 9 जानेवारी रोजी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी समाज माध्यमांशी संवाद साधला. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार म्हणाले, “या हत्या प्रकरणाचा विविध तपास यंत्रणांकडून तपास करण्यात येत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणात कोणी दोषी सिद्ध झाल्यास त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात येईल. पक्ष वगैरे न बघता यामध्ये वरिष्ठ पातळीवर काम करणारे कोणी दोषी आढळल्यास त्यांची गय केली जाणार नाही, असे आपण देवेंद्र फडणवीस यांना भेटून सांगितल्याचे अजित पवार म्हणाले. ही निर्घृण पद्धतीने झालेली हत्या आहे. अशा प्रकारच्या घटना अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असेही अजित पवार म्हणाले.

Murder चा कट मुंडेंच्या निकटवर्तीयांचाच
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून सामाजिक संघटनांनी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्यात आंदोलनं सुरू केली आहेत. या हत्याप्रकरणामुळे धनंजय मुंडे वादाच्या केंद्रस्थानी सापडले आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची राज्यभरातून मागणी केली जात आहे. धनंजय मुंडेंचा कथित निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड यानेच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला, असा आरोप करण्यात येत आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणालां एक महिना उलटून गेला आहे. पण अजुनही सर्व आरोपींना अटक करण्यात आले नाही. काही दिवसांपूर्वी मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह सुधीर सांगळे याला अटक करण्यात आली होती. हत्या झाल्यानंतर कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले हे फरार झाले होते. आरोपींना तावडीत घेण्यासाठी सीआयडीने प्रसिद्धीपत्रक जारी करून त्यांना फरार घोषित केले होते. त्यानंतर 4 जानेवारी रोजी यातील दोघांना अटक करण्यात आली होती. तर तिसरा आरोपी कृष्णा आंधळेचा शोध घेण्यात येत आहे.