महाराष्ट्र

माजी मुख्यमंत्र्यांसाठी Devendra Fadnavis यांच्यासोबत एकत्र आले नेते

पक्षीय राजकारण विसरत Chandrapur येथे नेते एकवटले

Author

राजकारणात काही क्षण असे येतात ज्यावेळी राजकीय नेते पक्षभेद विसरून एकत्र येतात. असाच एक प्रसंग चंद्रपूर येथे आला. यावेळी सर्वपक्षीय नेते एका व्यासपीठावर एकत्र आलेत.

पक्षीय मतभेद विसरत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेते शुक्रवार, 10 जानेवारीला एकाच व्यासपीठावर एकत्र आले. निमित्त होते माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवाचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी कार्यक्रमाला संबोधित केलं. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यावेळी व्यासपीठावर होत्या. विधान सभेचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार हे देखील व्यापीठावर दिसले. भाजपचे दोन दिग्गज नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार किशोर जोरगेवार हे देखील मंचावर होते.

भाजपनं संधी दिल्यामुळे आमदार झालेले देवराव भोंगळे, हंसराज अहीर, आमदार सुधाकर आडबाले असे सर्वपक्षीय नेते यावेळी मारोतराव कन्नमवार यांच्या स्मृतीसाठी नतमस्तक झालेत. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी राज्यातील सर्व नेते एकवटले होते. त्यासाठी मारोतराव कन्नमवार यांनी पुढाकार घेतला होता. आता त्याच कन्नमवार यांच्यामुळं विदर्भातील सर्वपक्षीय राजकीय नेते एकत्र आल्याची प्रचिती सगळ्यांना आली. फडणवीस यांच्यासह सर्वांनीच यावेळी कन्नमवार यांच्या स्मृतीला अभिवादन केलं.

असाही योगायोग

कन्नमवार यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रम आणखी एक योगायोग दिसून आला. मारोतराव कन्नमवार चंद्रपूर जिल्ह्यातील मूलचे रहिवासी होते. देवेंद्र फडणवीस यांचं बालपण मूलमध्येच गेलं आहे. त्यामुळे मूलशी आपली नाळ जुळल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. चंद्रपूर जिल्ह्याशी संबंधित असलेले कन्नमवार पहिले मुख्यमंत्री होते. त्यानंतर आपण मुख्यमंत्री झालो. महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री चंद्रपूर जिल्ह्यानं दिल्याचंही फडणवीस म्हणाले. मारोतराव कन्नमवार हे आधी उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर ते मुख्यमंत्री झालेत. आपण आधी मुख्यमंत्री होतो. त्यानंतर उपमुख्यमंत्री झालोत. आता पुन्हा मुख्यमंत्री झाल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.

चंद्रपूर आणि मूलमध्ये आपल्या आयुष्याचा बराच काळ व्यतीत केल्याचा आपल्याला अभिमान वाटतो. चंद्रपूर महाकालीचा जिल्हा आहे. महाकालीच्या आशीर्वादानं सगळी विघ्न दूर होतात. आता सामान्यांच्या जीवनात व्यापक बदल घडविण्याचा आशीर्वाद आपण माता महाकालीकडे मागितला पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं. चंद्रपूर जिल्ह्याबद्दल आपल्या मनात प्रेम आहे. त्यामुळं चंद्रपूर जिल्ह्याला वाली नाही असं म्हणता येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक राजकीय नेता जिल्ह्याचा वालीच असल्याचंही फडणवीस म्हणाले. विकासाच्या वाटचालीत पक्ष आणि विचार वेगळे असतात. निवडणूक संपल्यानंतर समान्यांच्या हितासाठी एकत्र राहायला हवं, असं आवाहन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फडणवीस यांनी विनंती केली. मारोतराव कन्नमवार यांच्यावर विधिमंडळात गौरव ग्रंथ तयार व्हावा, अशी विनंती फडणवीस यांनी यावेळी केली.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!