
सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे कुठल्या टोळीचा हात असल्याच्या प्रश्नावर राज्य गृहमंत्री योगेश कदम यांनी दिले स्पष्टीकरण.
बॉलिवुड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर त्यांच्या राहते घरी हल्ला झाला. एक दरोडेखोर त्यांच्या घरात शिरला होता. या दरोडेखोराशी झालेल्या झटापटीत सैफ अली खान यांना गंभीर इजा झाली. या संबंधित एका संशयीताला ताब्यात घेण्यात आले आहे. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले. या हल्ल्यात गुन्हेगारी टोळीचा हात नसल्याचे, योगेश कदम यांनी स्पष्ट केले आहे. 17 जानेवारी रोजी पुणे पोलिस आयुक्तालयात पोलिस अधिकाऱ्यांनी बैठक पार पडली. या बैठकीत कदम बोलत होते.
मुंबई शहरातील वांद्रे भागात सैफ अली खान यांच्या राहते घरात शिरुन हल्ला करण्यात आल्याची घटना 16 जानेवारी मध्यरात्रीच्या वेळी घडली. यापूर्वी वांद्रे भागातच अभिनेता सलमान खान याच्या निवासस्थानावर गोळीबार करण्यात आला. माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला. या दोन्ही घटनांमागे लाॅरेन्स बिष्णोई याच्या टाेळीचा हात आहे. सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागेही कोणत्या गुन्हेगारी टोळीचा हात आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सीसीटीव्हीतील संशयित ताब्यात
योगेश कदम म्हणाले की, ‘सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे कुठल्याही गुन्हेगारी टोळीचा हात नाही. चोरी करण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील छबीत एक संशयित आढळून आला आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. याप्रकरणात आणखी काही जण सामील असल्याचा संशय असून, त्यांचा शोध सुरू आहे, असे योगेश कदम म्हणाले. सैफ अली खान याच्या अपार्टमेंटच्या परिसरात सुरक्षारक्षक नव्हते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिस संशयितांच्या मागावर आहेत, असेही योगेश कदम म्हणाले आहेत. पोलिस आयुक्तालयात झालेल्या या बैठकीत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुंबई Unsafe म्हणणे अयोग्य
सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही 16 जानेवारी रोजी प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले की, मुंबई देशातील सर्वात जास्त सुरक्षित मेगा सिटी आहे. देशातील सर्व मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे, असे आपल्याला वाटत असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. कधी कधी काही घटना घडतातच, हे खरं आहे. त्यांना गंभीरतेने घेणं देखील महत्त्वाचा आहे. परंतु फक्त अशा काही घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे, असे म्हणणे अतिशय चुकीचे आहे. मुंबईला असुरक्षित म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण यामुळे मुंबईची प्रतिमा खराब होऊ शकते. पण मुंबई शहर अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे, याकरिता सरकार नक्कीच प्रयत्न करणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.