
राज्यातील राजकारण नवे रूप घेत आहे. महायुतीत अंतर्गत वाद सुरू झाल्याने महायुतीतील घटक पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गटात फूट पडू शकते, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
महायुतीत सध्या अंतर्गत वाद सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महायुतीतील शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय परिस्थिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अशातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मोठा दावा केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, शिंदे गटात नवे नेतृत्व उदयास येणार आहे. एकनाथ शिंदे गटातील उदय सामंत हे 20 आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे गटाच्या बाहेर पडू शकतात. या वीज आमदारांच्या पाठिंब्याने सामंत नवीन गटाचे नेतृत्व करू शकतात. एकनाथ शिंदे यांना हटविण्याची योजना भाजपकडून आखली जात आहे. एकनाथ शिंदे यांना या हालचालीची जाणीव होताच त्यांनी दबावतंत्र बदलले आणि अखेर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. शिंदे आता वारंवार चिंतेत राहतात. साताऱ्यातील त्यांच्या गावी जाऊन सल्लामसलत करतात, असे संजय राऊत म्हणाले.

ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या संपर्कात
सामंत यांनी यापूर्वी दावा केला होता की, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटाच्या संपर्कात आहेत आणि लवकरच पक्षात प्रवेश करतील. सामंत यांच्या मते, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटामधील बऱ्याच नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याची तयारी केली आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे गटातील संभाव्य नेतृत्व बदल आणि भाजपच्या हालचालीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेतल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे पुढील राजकीय दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीतही मतभेद
दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होताना दिसते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने गेल्या विधानसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवली होती. परंतु आता स्थानिक निवडणुकांबाबत मतभेद उघड झाले आहेत.
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी संजय राऊत यांना “गैरमहत्त्वाचे” ठरवत त्यांच्यावर टीका केली होती. पटोले म्हणाले की, “संजय राऊत यांचे विधान आमच्यासाठी अजिबात महत्त्वाचे नाही.” याशिवाय, राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शिवसेनेने स्वबळावर लढण्याची योजना आखल्याचे वक्तव्य केले होते, त्यावरही नाना पटोले यांनी टीका केली होती.