
पद्म पुरस्कारांमध्ये यवतमाळ जिल्ह्यानं बाजी मारली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील शेतकरी संघटना आणि लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
केंद्र शासनाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची यादी जाहीर केली. यवतमाळ जिल्ह्यातील नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते, प्रशिक्षक, चिकित्सक आणि दीनदयाल सेवा प्रतिष्ठान संचालित दीनदयाल प्रबोधिनीचे अध्यक्ष सुभाष शर्मा यांना भारत सरकारचा प्रतिष्ठित ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. सुभाष शर्मा यांच्या रूपाने यवतमाळ जिल्ह्याला प्रथमच पद्मश्री हा सन्मान प्राप्त झाला आहे.

मागील तीस वर्षांपासून सुभाष शर्मा नैसर्गिक शेती करत आहेत. शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देत आहेत. शर्मा यांच्या प्रेरणेने देशभरातील हजारो शेतकरी विषमुक्त नैसर्गिक शेती करीत आहेत. यवतमाळ जवळच्या तिवसा येथील त्यांची 20 एकर शेती एक प्रकारे नैसर्गिक शेतीची प्रयोगशाळाच म्हणता येईल. या शेतीमध्ये त्यांनी रासायनिक खते किंवा कीटकनाशके यांचा वापर केलेला नाही. केवळ देशी गायीचे शेण, गोमूत्र आणि इतर नैसर्गिक निविष्ठांचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने भरघोस उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. आजपर्यंत लाखो शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात भेटी देऊन प्रशिक्षण घेतले आहे.
Government ने केला योग्य सन्मान
यवतमाळ हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी गाजलेलले शहर. जिल्ह्यातील सुभाष शर्मा यांच्यासारख्या कृषी चिंतकास पद्मश्री हा प्रतिष्ठित पुरस्कार केंद्र शासनाने घोषित केला. त्यामुळे भारत सरकारने योग्य सन्मान केल्याची भावना कृषी क्षेत्रातील जनता व्यक्त करीत आहेत. शेतकरी संघटनांनी भारत सरकारच्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
नैसर्गिक शेती तज्ञ सुभाष शर्मा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे भारत सरकारच्या तिन्ही पद्म पुरस्कारांवर यवतमाळकरांनी मोहोर उमटवली आहे. यापूर्वी ज्येष्ठ राजकारणी, स्वातंत्र्य सेनानी लोकनायक बापूजी अणे उर्फ माधव श्रीहरी अणे यांना भारत सरकारने ‘पद्म विभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच वामन(दादा) बापूजी मेत्रे कळंब येथील ज्येष्ठ संशोधक, शास्त्रज्ञ आहेत. यांनाही भारत सरकारकडून ‘पद्म भूषण’ प्राप्त झाले आहे.
सुभाष शर्मा यांच्या शेतीविषयक प्रयोगांना हरित क्रांतीचे जनक भारतरत्न डॉ. स्वामिनाथन, भारत सरकारचे अतिरिक्त सचिव पी. डी. मिश्रा, नाबार्डचे अध्यक्ष उमेशचंद्र सारंगी, महाराष्ट्राचे कृषी सचिव सुधीरकुमार गोयल, समाजसेवक अण्णा हजारे, रा. स्व. संघाचे तत्कालीन सरकार्यवाह भय्याजी जोशी, आफ्रिकेचे राजदूत असदाक के, इंडियन ऑरगॅनिक असोसिएशनचे क्लाउड अल्वारीस यांच्यासह देश विदेशातील अनेक तज्ज्ञ मंडळी आणि मान्यवरांनी भेट दिली आहे. त्यांच्या या अलौकीक कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘कृषिभूषण’ पुरस्कार, अग्रोवनचा ‘स्मार्ट शेतकरी’ अवॉर्ड, दीनदयाल सेवा प्रतिष्ठानचा ‘पंडित दीनदयाल उपाध्याय सेवा पुरस्कार’ आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.