
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाला मोठा धक्का बसला आहे.
पक्षाच्या उपनेत्या आणि चार वेळा नगरसेविका राहिलेल्या राजुल पटेल यांनी कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केला आहे. पटेल यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला बळ मिळाले असून उद्धव गटाची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राजुल पटेल यांचा राजकीय प्रवास
राजुल पटेल या शिवसेनेतील निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. चार वेळा नगरसेविका राहिल्यानंतर त्यांनी आरोग्य समितीच्या अध्यक्षपदावरही काम केले आहे. महिलांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर कार्य केले असून, विधानसभा महिला संघटक म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
पटेल यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वर्सोवा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांच्या जागी हारून खान यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे नाराज झालेल्या पटेल यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. वर्सोवा विधानसभेतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून मी पक्ष सोडला. मला चांगली वागणूक मिळाली नाही, असे त्या म्हणाल्या.
महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला मिळणार बळ
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजुल पटेल यांचा शिंदे गटात प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. वर्सोवा मतदारसंघात त्यांचे राजकीय वजन असून त्यांच्या माध्यमातून शिंदे गटाला अधिक कार्यकर्त्यांची ताकद मिळू शकते.
महापालिका निवडणुकीत हा बदल शिंदे गटासाठी फायदेशीर ठरेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पटेल यांचा शिवसेना उद्धव ठाकरे गट सोडण्याचा निर्णय ऐन निवडणुकीच्या काळात ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर राजन विचारे यांचा हल्लाबोल
दुसरीकडे, माजी खासदार राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटावर जोरदार टीका केली आहे. ठाण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून फक्त राजकारण केले जात आहे, असा आरोप विचारे यांनी केला.
आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलेच सुनावले. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांची नावे काढून स्वतःच्या नावाने पक्ष चालवून दाखवा, असा टोला विचारे यांनी लगावला. राजन विचारे यांनी आनंद दिघे स्मारकावरूनही ठाकरे गटावर गंभीर आरोप केले. मी स्वतः प्रकल्प अहवाल तयार केला होता, पण मी शिंदे गटात नाही म्हणून हा प्रकल्प रद्द केला गेला. हा आनंद दिघे यांचाही अपमान आहे, असे विचारे म्हणाले.
उद्धव ठाकरे स्वीकारतील फडणवीस अन् Narendra Modi यांचं नेतृत्व
शिवसेनेतील संघर्ष वाढतोय
शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही गट जोरदार तयारी करत असून, राजुल पटेल यांसारख्या महत्त्वाच्या नेत्यांच्या पक्षांतरामुळे राजकीय समीकरणे बदलत आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना गटांचे हे अंतर्गत राजकारण आणि नेत्यांचे पक्षांतर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे गट स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे, तर दुसऱ्या बाजूला शिंदे गट नवीन सदस्यांच्या प्रवेशामुळे आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे.