महाराष्ट्र

महाराष्ट्राला डावलण्याचा डाव? Ambadas Danve यांची फडणवीसांवर टीका!

महाराष्ट्र GST भरेल, अन् बिहारच्या पदरात जाईल?

Author

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर संतप्त प्रतिक्रिया देत महाराष्ट्राच्या निधीचा बिहारसाठी वापर होत असल्याचा आरोप केला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पावर महाराष्ट्रात राजकीय वादंग पेटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या बजेटचे कौतुक केले असले तरी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राचा निधी अन्य राज्यांकडे वळवण्याचा हा खेळ असून महाराष्ट्राच्या नावे गुजरात धार्जिण्या घोषणा खपवू नका, असा संतप्त इशारा त्यांनी दिला आहे.

दानवे यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर देताना केंद्र सरकारच्या महाराष्ट्राविषयीच्या धोरणांवर प्रखर भाष्य केले. महाराष्ट्राने जीएसटी भरावा अन् केंद्राने तो बिहारच्या झोळीत टाकावा, एवढाच हा खेळ सुरू आहे. हा अन्याय महाराष्ट्राला सहन होणार नाही, असे ते म्हणाले.

पेनड्राईव्हमधील भ्रष्टाचाराचे पुरावे; Ajit Pawar यांचा  जबरदस्त एक्शन प्लान!

 

महाराष्ट्राला आश्वासनांचे तुकडे?

 

दानवे यांनी हायस्पीड रेल्वे प्रकल्पावरही आक्षेप घेतला. महाराष्ट्राच्या माथ्यावर हा प्रकल्प मारला आहे. राज्यात कोणी हा प्रकल्प मागितला होता का? ही गुजरात धार्जिणी घोषणा महाराष्ट्राच्या नावे खपवू नका,असे ते म्हणाले. त्यांनी मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टसाठी दिलेल्या 511 कोटींच्या निधीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या रकमेची तुलना प्रकल्पाच्या मूळ किंमतीशी करा. मग हा निधी किती नगण्य आहे हे स्पष्ट होईल, असा दावा त्यांनी केला.

ग्रामीण भागासाठी जाहीर केलेल्या निधीवरही दानवे यांनी टोलाच लगावला. महामार्गांच्या देखभालीसाठी 683 कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे. मात्र तो गावागणिक वाटल्यावर याचे स्वरूप तुटपुंजेच ठरणार आहे. पोराने मोठी कॅडबरी मागावी आणि काकाने हाती एक संत्रा गोळी ठेवावी, असा हा प्रकार आहे, असे ते म्हणाले.

नागपूरला  Chandrashekhar Bawankule देणार एक्स्ट्रा हजार कोटी

शेतकर्‍यांच्या फसवणुकीचा आरोप 

 

ऍग्रीबिझनेस नेटवर्कसाठी जाहीर केलेल्या निधीवरही त्यांनी टीका केली. या आधीही असे प्रकल्प जाहीर झाले होते. मात्र, त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा झाला नाही. यावेळी तरी सरकारने शेतकऱ्यांच्या हातात काही ठोस देण्याची ग्वाही द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

दानवे यांनी इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावरही भाजपला लक्ष्य केले. आळंदी-देहू-पंढरपूरचे उंबरे झिजवणारे भाजप नेते इंद्रायणीच्या फेसाने व्यापलेल्या पाण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. वारकऱ्यांवर लाठ्या चालवणारे हे सरकार त्यांची वेदना कधी समजून घेणार?” असा सवाल त्यांनी केला. दानवे यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा देत म्हटले की, महाराष्ट्राला जाणीवपूर्वक बाजूला ठेवणारे धोरण यापुढे सहन केले जाणार नाही. राज्याला योग्य हक्क मिळालेच पाहिजेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!