
शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आणण्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर आता रामदास कदम यांनी शिरसाठ यांना चांगलेच सुनावले आहे.
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेनेत ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून जोरदार इनकमिंग होत आहे. अशात शिवसेना नेते संजय शिरसाठ यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांना एकत्र आणू शकतो, असे विधान केले होते. त्यावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाठ यांच्या विधानाचा रामदास कदम यांचे पुत्र आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही समाचार घेतला होता.
दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात. संजय शिरसाट यांच्या या विधानामुळे शिवसेना शिंदे गटात घामासान रंगले दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना रामदास कदम म्हणाले की, संजय शिरसाट हा इतका मोठा माणूस नाही. तर संजय शिरसाट काय बोलतात याला काहीही महत्व नाही, असे योगेश कदम म्हणाले होते. त्यामुळे पिता पुत्रांनी शिरसाट यांची शिवसेनेतच कोंडी केली आहे. यावर संजय शिरसाट काही प्रतिक्रिया देतात का, यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

आम्ही 55 वर्ष घासली
रामदास कदम यांनी शिरसाट यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय त्यांच्यावर टीकाही केली. संजय शिरसाट इतका मोठा माणूस नाही. आम्ही 55 वर्ष शिवसेनेत घासली आहे. आम्ही शिवसेनेचे नेते झालो. संजय शिरसाठ जे काही बोलले ते त्यांचे वैयक्तिक मत असावं. उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासाठी पुष्कळ काही केलं असावं, म्हणून त्यांचे इतकं प्रेम उतू जात असणार, अशा शब्दातही कदम यांनी शिरसाट यांना सुनावलं. एकनाथ शिंदेच्या मुळावर जे उठले त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं रामदास कदम यांनी स्पष्ट सांगितलं.
यावेळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंवर आणखी वाईट दिवस येतील. यांच्यासोबत कोणीही राहणार नाही. फक्त त्यांचा मुलगा आणि त्यांचे नातेवाईक हे दोघेच राहतील. शिवाय एक दिवस रात्री दोन वाजता हे देश सोडून निघून जातील, असं ही कदम म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरे यांना ही लक्ष्य केलं. आदित्य यांची औकात काय आहे, मला काका म्हणून म्हणून माझं खातं समजून घेतलं. नंतर माझ्याच पाठीत खंजीर खुपसला. माझं खातं हिरावून घेतलं असं पुन्हा एकदा कदम म्हणाले.
राक्षसी महत्त्वाकांक्षीमुळे शिवसेना फुटली
बाळासाहेबांच्या भूमिकेला मूठ माती देण्याचं काम काँग्रेस सोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनी केलं. आता भाजपा त्यांना कशाला जवळ करेल असंही कदम म्हणाले. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात शिवसेनेच्या आमदारांना किती फंड दिला. त्याच वेळी अजित पवारांनी आपल्या आमदारांना किती फंड दिला हे एकदा जाहीर करावे, असे आव्हान कदम यांनी दिले. मुख्यमंत्रिपदाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षीमुळे शिवसेना फुटली, असा आरोपही रामदास कदम यांनी यावेळी केला.