
इंदोरा चौकात पाईपलाईन टाकण्यासाठी महापालिकेने पुन्हा एकदा रस्ता खोदला आहे. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी आणि धुळीचा त्रास सहन करावा लागला आहे.
नागपूरच्या इंदोरा चौकात महापालिकेच्या ओसीडब्ल्यू विभागाने पुन्हा एकदा मुख्य पाण्याच्या पाइपलाइनसाठी खोदाई केली आहे. नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. महिनाभरापूर्वीच या रस्त्याची डागडुजी करून पक्क्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. तरीदेखील आता पुन्हा खोदकाम सुरू केल्यामुळे महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
डागडुजी करून नवा रस्ता तयार करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. पण महिनाभरातच पाण्याच्या पाइपलाइन दुरुस्तीच्या नावाखाली हा रस्ता पुन्हा खोदला जात आहे. नागरिक विचारतात की महापालिकेने आधीच योग्य नियोजन का केले नाही? या कामामुळे इंदोरा चौक, कमल चौक आणि त्यालगतच्या परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडी, धुळीचा त्रास आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे सामान्य जनतेचा राग उफाळून येत आहे.

जबाबदाऱ्यांना कारवाईसाठी धारेवर धरा
महापालिकेच्या ओसीडब्ल्यू विभागाने वेळोवेळी अशा कामांसाठी ठोस नियोजन करावे आणि खोदकाम झालेल्या रस्त्यांची त्वरीत दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रस्ते वेळेत तयार झाले नाहीत, तर आंदोलने होतील, असे एका महिला नागरिकाने ठणकावून सांगितले. पाइपलाइनच्या नावाखाली वारंवार रस्त्यांची तोडफोड सहन केली जाणार नाही, असे नागरिक ठामपणे सांगत आहेत. जर महापालिकेने त्वरित उपाययोजना केली नाही, तर याचे परिणाम गंभीर होतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.महापालिकेच्या कामगिरीवर प्रश्न उभे राहणे नवीन नाही, का तयार होते असंख्य खड्डे? हा मोठा प्रश्नचिन्ह आहे, पण नागरिक आता अधिक सजग झाले आहेत. रस्त्यांच्या या समस्येला कायमस्वरूपी तोडगा लावला नाही तर जनक्षोभाची ठिणगी महापालिकेसाठी अडचणीची ठरू शकते.
विदर्भातील शेतकऱ्यांसाठी C.P Radhakrishnan ठरतील का तारणहार ?
व्यवसायांवर आर्थिक ताण
इंदोरा चौकातील दुकानदारांना खोदकामामुळे वाहतूक कोंडी आणि धुळीमुळे मोठा फटका बसला आहे, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय प्रभावित होतो आहे. रस्ते दुरुस्त न झाल्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे, आणि खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. प्रशासकीय यंत्रणा यावर काहीही उपाय करत नाही.