महाराष्ट्र

जरांगेचा मुंबईत गनिमी कावा आंदोलनाचा इशारा

फडणवीसांना स्वतःच्या मुलीची काळजी, मग मराठ्यांच्या मुलांबद्दल का नाही?

Author

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. स्वतःच्या मुलीच्या परीक्षेसाठी फडणवीस 500 मीटर दूर राहायला जात नाही, पण मराठा समाजाच्या मुलांसाठी त्यांना ही तळमळ का नाही? असा परखड सवाल जरांगेंनी विचारला आहे. त्यांनी आपल्या भाषणात मराठा समाजाच्या मागण्यांची दखल न घेतल्याबद्दल सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 
 

मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करत त्यांच्या नियतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी EWS आरक्षण काढून मराठा समाजाला दोष दिल्याचा आरोप केला. मराठा विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांनंतरही ठोस निर्णय न घेतल्याबद्दल सरकारवर नाराजी व्यक्त केली. फडणवीस स्वतःच्या मुलीच्या शिक्षणाला महत्त्व देतात, पण मराठा विद्यार्थ्यांबाबत तशी तळमळ दिसत नाही, असा आरोप त्यांनी केला.

शिवरांबाबत अभिनेत्याचे विधान; Amol Mitkari यांची सटकली

 

गनिमी कावा आंदोलनाची घोषणा

मनोज जरांगे यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे की, आता आंदोलनाची दिशा वेगळी असेल. आम्ही लवकरच आंदोलनाची तारीख जाहीर करू. मुंबईत जाऊन उपोषण नाही, तर आमची शक्ती दाखवणार आहोत. आम्ही गनिमी कावा आंदोलन करू, त्याचं स्वरूप आता सांगणार नाही, असं स्पष्ट करत त्यांनी सरकारला सजग राहण्याचा इशारा दिला आहे. 

जरांगे यांनी आंदोलनासाठी मुंबईतील शिवाजी पार्क किंवा आझाद मैदानाची पाहणी करणार असल्याचं सांगितलं. मुंबईत आंदोलन सुरू झाल्यावर आम्ही थांबणार नाही. आरक्षण मिळवायचं असेल, तर सरकारला आमच्या मागण्यांची दखल घ्यावी लागेल, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. मराठा विद्यार्थ्यांनी आत्महत्या करू नये, असा भावनिक संदेशही त्यांनी दिला. एका टक्क्याने मागे पडलात तरी पुन्हा लढा, पण आयुष्य संपवू नका. मला लवकरच रुग्णालयातून सुट्टी मिळेल, आणि त्यानंतर मी संघर्षाची नवी दिशा ठरवणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी एक इंचही मागे हटणार नाही, असं त्यांनी ठामपणे जाहीर केलं.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शोध मोहिमेचा GPS नितीन राऊतांवर थांबला?

मराठा समाजाचा उद्रेक वाढणार?

 

मनोज जरांगेंच्या या घोषणेमुळे मराठा समाजाचा उद्रेक वाढण्याची शक्यता आहे. सरकारकडून जर लवकरच ठोस पावलं उचलली गेली नाहीत, तर महाराष्ट्र पुन्हा एकदा आंदोलनाच्या आगीत होरपळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जरांगेंनी दिलेला गनिमी कावा आंदोलनाचा इशारा सरकारसाठी मोठं आव्हान ठरू शकतो. 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!