
राज्यातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, असा मोठा गौप्यस्फोट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जयपूर डायलॉगच्या डेक्कन समिट कार्यक्रमात शनिवारी दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा खुलासा केला.
देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, भाजप आणि शिवसेनेमध्ये अडीच-अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा कोणताही करार झालेला नव्हता. “उद्धव ठाकरेंनी भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मी, आदित्य ठाकरे आणि रश्मी वहिनी बाहेर बसलो होतो, तर उद्धव ठाकरे अमित शहांसोबत चर्चा करत होते. त्यानंतर ठरल्याप्रमाणे पत्रकार परिषद घेतली. जर मुख्यमंत्रिपदाबाबत काही चर्चा झाली असती, तर बाहेर आल्यावर उद्धव ठाकरेंनी मला त्याबाबत सांगितले असते. मात्र तसे काहीच घडले नाही,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आम्ही कोणाचेही पैसे परत घेतले नाहीत; Devendra Fadnavis यांनी केले स्पष्ट
भाजपपासून दुरी
यावेळी फडणवीस यांनी मोठा दावा करत सांगितले की, भाजपला जर 120 जागा मिळाल्या असत्या, तर उद्धव ठाकरे कधीही त्यांना सोडून गेले नसते. “निकाल जाहीर झाल्यावर उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत पत्रकार परिषद घेण्याऐवजी स्वतः पत्रकार परिषद घेतली आणि सर्व पर्याय खुले आहेत, असे जाहीर केले. हीच ती निर्णायक वेळ होती, जेव्हा शिवसेनेने भाजपपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. आपण सरकार बनवू शकतो, हे ठाकरेंच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी रंग बदलला, असे फडणवीस म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदारसंख्येत वाढ झाल्याच्या मुद्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. “राहुल गांधी यांनी त्यांच्या पराभवाची खरी कारणे शोधली, तर काँग्रेस वाचू शकते. पण जर त्यांनी निरर्थक कारणे पुढे करत राहिले, तर आगामी काळात काँग्रेसची अवस्था अधिकच बिकट होईल. महायुती आणि महाविकास आघाडीच्या मतांमध्ये एक कोटींचा फरक आहे. राहुल गांधी हे भ्रमात राहणारे नेते आहेत आणि जनतेने त्यांची साथ सोडली आहे, हे त्यांना अजूनही कळलेले नाही,” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
डाव आधीच आखलेला?
फडणवीस यांच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होते की, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात अगोदरच काही ठरले होते. फडणवीस यांच्या मते, शिवसेनेने भाजपला फसवले आणि सत्ता मिळवण्यासाठी रंग बदलला. त्यामुळेच भाजपला सत्ता गमवावी लागली आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.
फडणवीस यांच्या या आरोपांवर शिवसेनेची अधिकृत प्रतिक्रिया काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, 2019 मध्ये राज्यात झालेल्या राजकीय घडामोडींबाबत फडणवीस यांनी आणखी एक नवा खुलासा करून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणले आहे.