
यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील 2.85 लाख शेतकऱ्यांना 232 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने प्रभावी योजना राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य मिळाले आहे.
शेती व्यवसाय करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हवामानातील अनिश्चितता, पीक नुकसानीची शक्यता, शेतीसाठी आवश्यक भांडवल यांसारख्या समस्या शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरतात. या पार्श्वभूमीवर त्यांना निश्चित उत्पन्न मिळावे आणि आर्थिक स्थैर्य लाभावे यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विशेष योजना राबवण्यात येत आहेत.

दरवर्षी स्थिर सहाय्य
केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. याअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6 हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना तातडीच्या आर्थिक गरजांसाठी मदत करणे आणि त्यांना स्थिर उत्पन्नाचा आधार देणे हा आहे.
या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने नमो किसान महासन्मान निधी ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गतही शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6 हजार रुपयांचे सहाय्य दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना एकूण 12 हजार रुपये दरवर्षी मिळतात, ज्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मोठी मदत होते.
रिक्षाचालकाच्या मारहाणीतून Former MLA सुटले, पण पायऱ्यांवर कोसळले
मिळणार मोठा निधी
यवतमाळ जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2 लाख 85 हजार 897 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना नमो किसान महासन्मान योजनेचाही लाभ दिला जात आहे. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 232 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. त्यापैकी 118 कोटी 9 लाख रुपये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून आणि 114 कोटी रुपये नमो किसान महासन्मान निधी योजनेतून वितरीत झाले आहेत.
या दोन्ही योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत आहे. बँक खात्यात ठराविक अंतराने पैसे जमा होत असल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त कर्ज घेण्याची गरज भासत नाही. त्यांना तातडीच्या खर्चासाठी कुणाकडे पैसे मागावे लागत नाहीत, तसेच सावकाराच्या कचाट्यात अडकण्याची वेळ येत नाही. हे अर्थसहाय्य नियमित स्वरूपात मिळत असल्याने शेतीच्या कामांसाठी लागणाऱ्या खर्चात मदत होते आणि शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो.
शेतकऱ्यांसाठी उज्ज्वल भविष्य
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो किसान महासन्मान निधी या दोन्ही योजना शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाच्या ठरत आहेत. आर्थिक सहाय्य मिळाल्याने शेतकऱ्यांचे आत्मविश्वास वाढत असून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याची तयारी ते दर्शवत आहेत. भविष्यात अधिक चांगल्या योजना राबवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे सरकारचे प्रयत्न सुरूच आहेत.
निशिकांत राऊत, हिवरी, महागाव तालुक्यातील शेतकरी, सांगतात की या योजनांचे पैसे वेळच्या वेळी खात्यात जमा होत असल्याने अचानक लागणाऱ्या पैशांसाठी कुणाकडे मागायची वेळ येत नाही. आर्थिक मदतीचा नियमित स्रोत उपलब्ध असल्याने शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टी सहजपणे घेता येतात. यामुळे आर्थिक अडचणी कमी झाल्या आहेत.या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा आणि आपले जीवन समृद्ध करावे, असा सकारात्मक संदेश यातून मिळतो.