
ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना शिंदे गटात नेत्यांची इनकमिंग सुरू आहे. अशात एकनाथ शिंदे विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, असे संकेत आशिष जयस्वाल यांनी दिली आहेत.
शिवसेना शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणावर नेते व कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. त्यामुळे विरोधकांकडून शिंदे गटावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आमदार-खासदार फोडण्यासाठी कुणालाही आमिष दाखवले जात नाही. जर कोणी अशा प्रकारचे आरोप करत असेल, तर त्यांनी ठोस पुरावे द्यावेत, असे खुले आव्हान राज्याचे अर्थ राज्यमंत्री व शिवसेना नेते अॅड. आशिष जैस्वाल यांनी दिले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी शिवसेना ठाकरे गट सोडल्यापासून आतापर्यंत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील शिंदे गटात दाखल झाले आहेत. मात्र, तरीही ठाकरे गटाने आत्मचिंतन करण्यास नकार दिला आहे. कार्यकर्त्यांमध्ये असलेला असंतोष लक्षात घेता, मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचा दावा जैस्वाल यांनी केला.

आभार दौरा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या 20 फेब्रुवारीला विदर्भाच्या आभार दौऱ्यावर येत आहेत. रामटेक विधानसभा क्षेत्रातील कन्हान येथील केमिकल मैदानात आभार दौरा आणि जाहीर सभा होणार आहे. या दौऱ्यात अनेक महत्त्वाचे नेते व कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे संकेतही आशिष जयस्वाल यांनी दिले आहेत.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी गंभीर आरोप केले आहेत. आमदार व खासदार फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जात असल्याचा दावा केला. वेगवेगळ्या प्रलोभनांसोबतच दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचा आरोपही संजय देशमुख यांनी केला आहे. यावर प्रत्युत्तर देताना, “शिवसेना शिंदे गट कोणालाही जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून पक्षात आणत नाही. आरोप करणाऱ्यांनी कोणतेही तथ्यहीन वक्तव्य करण्याऐवजी ठोस पुरावे द्यावेत,” असे आशिष जैस्वाल यांनी स्पष्ट केले.
ऑपरेशन टायगरची चर्चा
‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरे गटाचे काही आमदार आणि खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. खासदार संजय देशमुख यांच्याही नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देताना देशमुख यांनी सांगितले की, “मी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोललो होतो. माझ्यावर कोणताही दबाव नाही.” त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
सुरक्षेबाबत स्पष्टीकरण
शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा व्यवस्था कमी केल्यामुळे कुणीही नाराज नाही. काही आमदारांनी यापूर्वीच सुरक्षा कमी करण्याची विनंती केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर काही काळ सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. मात्र, याबाबत अंतिम निर्णय गृह विभागाच्या सुरक्षा समितीच्या आढाव्यानंतर घेतला जातो, असेही राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी स्पष्ट केले.
अडीच वर्षं लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी जनतेची सेवा केली. मुख्यमंत्री असताना जनसामान्यांमध्ये कॉमन मॅन म्हणून आपले स्थान निर्माण केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पाऊले चालली. याचेच फलित म्हणून लोकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला, असे आशिष जयस्वाल म्हणाले.