
राज्यात दहावीच्या परीक्षेला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. प्रशासनाने कॉफी रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान सुरू केले आहे. तरीही दहावीचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आजपासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली, मात्र पहिल्याच दिवशीच परीक्षा गैरप्रकारांच्या चर्चांना उधाण आले. बदनापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर फुटल्याच्या चर्चेने शिक्षण विभागाला सतर्क केलं. शिक्षणाधिकारी, तहसीलदार आणि गटशिक्षणाधिकारी यांनी तातडीने केंद्रावर पोहोचून तपासणी सुरू केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातही पेपरफुटीबाबत समाज माध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे. संपूर्ण परीक्षा प्रक्रियेत सुरळीतता राखण्यासाठी मंडळाकडून विविध यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिस गस्ती पथक, बैठे पथक, तसेच परीक्षा हॉलमध्ये व्हिडिओ शुटिंगसारख्या कठोर उपाययोजनांचा अवलंब करण्यात आला आहे.

प्रशासन सतर्क
छत्रपती संभाजीनगर विभागात पाच जिल्ह्यांतील 644 परीक्षा केंद्रांवर एकूण एक लाख 88 हजार 776 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. कडक सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरही बदनापूर आणि मंठा तालुक्यातील तळणी केंद्रावर गोंधळ उडाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. विशेषतः बदनापूरमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याच्या चर्चेमुळे प्रशासन सतर्क झाले आहे.
पेपरफुटीबाबत समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या पोस्टची दखल घेत मंडळाने परीक्षा केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकांकडून अहवाल मागवला आहे. अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असून, त्यात परीक्षेतून बडतर्फी, फौजदारी गुन्हा दाखल करणे किंवा परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करणे यांसारख्या कठोर उपाययोजना केल्या जाऊ शकतात, असे विभागीय सचिव डॉ. वैशाली जामदार यांनी स्पष्ट केले.
पाऊले उचलूनही अपयश
राज्यात 21 फेब्रुवारीपासून दहावीच्या बोर्डाच्या परिक्षांना सुरवात झाली आहे. या परीक्षेसाठी शिक्षण मंडळाने मोठी तयारी केली होती. कॉपी मुक्ती अभियानासाठी अनेक पाऊले उचलली होती. त्यासंदर्भात माध्यमांमध्ये मंडळाने परीक्षा सुरळीत होणार असल्याचा दावा केला होता. परंतु मराठी विषयाच्या पहिल्याच पेपरला गोंधळ उडाला आहे.
शुक्रवारी 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पेपरला सुरुवात झाली. त्यानंतर जालना येथे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये प्रश्नपत्रिका बाहेर आली. जालन्यातील बदनापूर येथील केंद्रावर हा प्रकार घडाला. या ठिकाणी असलेल्या एका झेरॉक्स सेंटरवर थेट उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स करुन विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्या. येथे चक्क 20 रुपयात दहावीच्या प्रश्नपत्रिका मिळत आहे. जालना शहरातील झेरॉक्ससेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंटकाढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
दहावीच्या परीक्षेला सुरूवात झाली असून जालना जिल्ह्यात 102 परिक्षा केंद्रावर जवळपास 32 हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. शासनाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती. मात्र, कॉपीमुक्त परीक्षेचा फज्जा उडताना जालन्यात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी तरुणांची हुल्लडबाजी देखील पाहायला मिळत आहे.