
भंडारा-गोंदिया दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी करत नाना पटोळे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शिंदेंच्या या घणाघाती हल्ल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
राजकीय रंगमंचावर कधी ताज्या फुलासारखी सुगंधी सत्ता मिळते, तर कधी वाऱ्याच्या झोक्याने ते फूल गळूनही पडते. नाना पटोले यांचा प्रवासही असाच काहीसा राहिला. कधी काँग्रेसच्या राज्यात सुपरपॉवर असलेले नाना, आज पक्षाच्या डावपेचांमध्ये दुर्लक्षित झाले आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या खापराखाली त्यांची प्रदेशाध्यक्ष पदाची ताकद दबली, आणि पक्षानेही त्यांना नव्या जबाबदारीपासून दूर ठेवले. विरोधी पक्षानेही पाठ फिरवली, आणि राजकीय व्यासपीठावर कधी चमकणारे नाना आता शांततेच्या छायेत उभे आहेत. नुकत्याच झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यातही हीच राजकीय एकाकीपणाची झलक दिसून आली.
राजकारणात जेव्हा एक नेता दुर्बल होतो, तेव्हा प्रतिस्पर्धी त्याचा फायदा घेतात. याच सूत्रानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडारा-गोंदिया दौऱ्यात जोरदार हल्लाबोल केला. शिंदेंच्या भाषणांनी राजकीय वातावरण तापवले, आणि नाना पटोलेंवर घणाघाती टीका करत त्यांची राजकीय घसरण अधोरेखित केली. विरोधी पक्षानेही नानांवर विश्वास ठेवण्यास मागेपुढे पाहिलं, आणि त्यांच्या एकाकीपणाचा प्रत्यय या दौऱ्यात प्रकर्षाने आला. ऑपरेशन टायगर ही शिंदे गटाची नवी खेळी असून, राजकारणात जो आक्रमक तोच टिकतो या धर्तीवर त्यांनी विदर्भावर लक्ष केंद्रित केले आहे. नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात त्यांनी शक्तिप्रदर्शनाचे मोठे नियोजन केले असून, अनेक नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या गटात सामील होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Marathi Sahitya Sammelan : अभिजात मायेच्या व्यासपीठावर ‘मिल बैठे दो यार’
कोराटेंचे सुसाट विधान
देवरी येथे शिंदेसेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला आणि तिथे झालेल्या घडामोडींनी सगळ्यांचे कान टवकारले. कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांच्यावर तुफान तोंडसुख घेतलं आणि काँग्रेसला टोला हाणला. तसंच, काँग्रेस सोडून आलेल्या सहषराम कोरोटेंच्या स्वागतात फुलं उधळली गेली. माजी आमदार सहषराम कोरोटे यांनी काँग्रेसला “ना ना” करत, अखेर शिंदेसेनेला “हां हां” म्हणत गळाभेट दिली. शिंदेसेनेत प्रवेश करताना कोरोटे यांनी शिंदे यांना थेट जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून संबोधले. शिंदेंनी राज्यभर विकासकामं केली. गोंदिया-भंडारा जिल्ह्याचा विकास त्यांच्या नेतृत्वाखाली वेगाने होईल. प्रत्येक गावात शिवसेना, प्रत्येक घरात शिवसैनिक हा आमचा संकल्प आहे, असं कोरोटे म्हणाले.
“ना ना करते प्यार उन्हीं से कर बैठे” असं म्हणत कोरोटे यांनी काँग्रेसवर केलेली टीका ऐकून उपस्थितांना सिनेमाचा डायलॉग वाटू लागला. काँग्रेसने फसवलं, वचनं मोडली आणि शेवटी, “जहाँ है नाना, वहाँ नाही जाना!” असं म्हणत कोरोटे यांनी राजकीय धोका सांगितला. आता त्यांनी शिंदेसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे आता त्यांचा गाव आणि मतदारसंघ झपाट्याने विकासाच्या दिशेने धावेल अशी ग्वाहीही शिंदे यांनी दिली.
गेट वेल सून मामू
कार्यक्रमात शिंदे यांनी एक भन्नाट डायलॉग मारला, काही लोक सकाळपासून काहीच काम नसल्यासारखे बरळत असतात. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, त्यामुळे त्यांना ‘गेट वेल सून मामू!’ असं म्हणणं योग्य ठरेल. आता, कोणता मामू आणि कोण बरळतोय, हे सगळ्यांनाच ठाऊक होतं. पण शिंदे यांनी नाव न घेता चिमटे काढले आणि शिवसैनिकांना सल्ला दिला की या बरळणाऱ्या लोकांना दुर्लक्ष करा. शिवाय, महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षांत प्रचंड विकासकामे केली असून भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवरही काबीज होण्याचा मानस असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं.
शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना डाइरेक्ट टोला मारला. काही लोक कचरा, गद्दार असं म्हणतात. पण त्यांनी आत्मचिंतन केलंय का? पक्ष म्हणजे आपणच सर्व काही असं काही जणांना वाटतं. पण “लांडग्याची कातडी पांघरून वाघ होता येत नाही, वाघ होण्यासाठी वाघाचं काळीज लागतं.” हा डायलॉग ऐकताच उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा पाऊस पाडला. आता ठाकरे गट काय उत्तर देणार, ते बघण्यासारखं असेल. कारण शिंदे यांच्या भाषणात थेट फायर होता.
उपमुख्यमंत्री पोहोचले लेट
कार्यक्रमाची वेळ झाली, पण उपमुख्यमंत्री अजूनही पोहोचले नव्हते. त्यामुळे कार्यकर्ते वैतागून परतायला लागले. मग आयोजकांनी हुकमी एक्का काढला “थांबा रे, मोठी घोषणा होणार आहे.” एवढं ऐकलं आणि कार्यकर्ते पुन्हा खुर्च्यांवर स्थिरस्थावर झाले. आता ही मोठी घोषणा नक्की काय होती? कोणालाच माहिती नाही. पण कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी हा ट्रिक जबरदस्त कामी आला.
आता कोरोटे यांनी ठरवलंय की, संपूर्ण गोंदिया-भंडारा जिल्ह्यात गाव तिथे सेना, घर तिथे सैनिक हा प्लॅन जोरात राबवायचा. म्हणजे आता राजकारणापेक्षा प्रचार जोरात दिसणार. लोक म्हणतात की, आता शिवसेनेचे नवे व्हर्जन आले आहे, ज्याचा युएसपी म्हणजे डबल इंजिन सरकार आणि मोठ्या घोषणा.