
विधानसभा निवडणुकीला आता बरेच दिवस झाले आहेत. मंत्रिमंडळ स्थिरस्थावर झालं आहे. अशात मतदारांच्या आभाराच्या निमित्तानं शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मंत्री आशिष जयस्वाल यांचे हात बळकट केले आहे.
प्रचंड विरोध असतानाही शिवसेनेकडून रामटेकमध्ये आशिष जयस्वाल यांना संधी देण्यात आली. लोकसभेतील ही जागा शिवसेनेला राखता आली नाही. परंतु विधानसभा निवडणुकीत मात्र रामटेकचा गड शिवसेनेनं काबीज केला. या मतदारसंघातील माजी खासदार कृपाल तुमाने यांचं ‘डिमोशन’ करून त्यांना आता विधान परिषदेचं आमदार करण्यात आलं आहे. तुमाने यांच्या रुपानं जे शिवसेनेला रामटेकमध्ये करणं शक्य झालं नाही, ते आता जयस्वाल यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या हेतूनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच नागपूर जिल्ह्याचा दौरा केला.
राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या मतदारसंघात शिंदेंनी सभा घेतल्या. निमित्त मतदारांच्या आभाराचं होतं. परंतु जयस्वाल यांचे हात त्यातून मजबूत झाल्याचं दिसत आहे. आशिष जयस्वाल यांना उमेदवारी देण्यावरून रामटेमध्ये बरेच रणकंद झालं. भाजपचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी तर अगदी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे झोपले आहेत का? अशीच भाषा वापरली. त्यामुळं रेड्डी यांच्यावर कारवाई देखील झाली. आता पुन्हा ते भाजपमध्ये घरवापसीसाठी ‘रेडी’ झाले आहेत. पण आता शिवसेनेकडून रामटेकमध्ये पकड मजबूत करण्याचं काम सुरू झालं आहे.

मोठा फायदा घेणार
लोक माने अगर न माने रामटेकमध्ये कृपाल तुमाने यांना पकड मिळविता आली नाही. त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये बरीच नाराजी होती. त्यामुळं शिवसेनेनं लोकसभा निवडणूक ‘कॅन्डिडेट चेंज’चा पर्याय निवडला. पण काँग्रेसचे सुनील केदार यांनी आपलं वर्चस्व या भागात सिद्ध केलं. मतदारांनीही ‘नो पारवे ओन्ली श्याम बर्वे’ यावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळं शिवसेना आणि भाजपनं विधानसभा निवडणुकीत कोणतीही जोखीम नको असं ठरवलं. आशिष जयस्वाल यांच्यासाठी तातडीनं ‘इनकमिंग’ सेवा सुरू केली. जयस्वाल आलेत. त्यांनी निवडणूक लढली. जयस्वाल जिंकलेही. नुसते जिंकलेच नाही तर मंत्रीही बनले. नुसते मंत्रीच बनले नाही तर सोन्याची खाण असलेल्या गडचिरोलीचे सहपालकमंत्रीही झालेत. गडचिरोलीसाठी सगळेच इतके आग्रही का असतात? हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. केवळ माओवाद संपविणं. गडचिरोली माओवाद मुक्त करणं हा एकमेव सामाजिक कार्याचा हेतू यामागं तर नक्कीच नाही.
निवडणूक जिंकल्यानंतर जयस्वाल आता पूर्व विदर्भातील शिवसेनेचे ‘हेवीवेट’ नेते झाले आहेत. पूर्व मध्ये एकनाथ शिंदे यांना आव्हानांचा ‘धनुष्य’ पेलणारा अर्जुनच मिळाल्यासारखं ते आहे. त्यामुळं सहाजिकत रामटेकमधील सभांच्या माध्यमातून शिंदे यांनी जयस्वाल विरोधकांसह महायुतीलाही योग्य तो संदेश दिला आहे. आगामी काळासाठी जयस्वालांवर आपला पूर्ण आशिष असेल हे शिंदे यांनी सगळ्यांना दाखवून दिलं आहे. जयस्वाल यांच्या माध्यमातून महायुती विशेषत: भाजपही रामटेकमध्ये अनेक हेतू साध्य करून घेणार आहे. खासदार श्यामकुमार बर्वे आणि एकूणच केदार गटाचं वर्चस्व मोडून काढणं हे देखील त्यापैकी एक राहणार आहे. एकनाथ शिंदे यांचा ‘आशिष’मिळाल्यानं रामटेकच्या आमदारसाहेबांचा ‘जय’ जयकार होणार, यात सवालच नाही.