महाराष्ट्र

Narendra Modi : मोटाभाई नंतर आता पंतप्रधानही झाले महाराष्ट्रासाठी कठोर

Mahayuti Politics : स्वच्छ शासन, जबाबदार प्रशासन; मोदींचे मुख्यमंत्र्यांना स्पष्ट आदेश

Author

काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात नव्हे फौजदारी कायदे लागू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. त्यानंतर आता नरेंद्र मोदी यांनीही फडणवीस यांना स्वच्छ प्रशासन ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

राज्यातील महायुती सरकारमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वच्छ प्रशासन ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. राज्य चालवताना कोणाच्याही दबावाखाली काम करू नका, कुणालाही पाठीशी घालू नका, असे पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितल्यामुळे महायुतीतील काही मंत्र्यांवर गंडांतर येण्याची चिन्हे आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे अडचणीत सापडले आहेत.

दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधी सोहळ्याला देशभरातील एनडीए सरकारचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. या सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्रातील स्वच्छ प्रशासन, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. “स्वच्छ प्रशासन हीच आमची प्राथमिकता आहे. कोणत्याही नेत्यावर आरोप असतील, तर कारवाईला विलंब होता कामा नये,” असे मोदींनी स्पष्ट केले.

Sanjay Raut: चार वेळा आमदार झाली पण, ताटात घाण करून गेली

अडचण वाढली

धनंजय मुंडे यांचं नाव बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सरपंच संजय देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात चर्चेत आहे. संजय देशमुख हे भाजप समर्थक होते आणि त्यांच्या निर्घृण हत्येनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या हत्येचा तपास सुरू असतानाच काही महत्त्वाचे पुरावे समोर आल्याने धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या. विरोधी पक्षांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली असून, स्वच्छ प्रशासन या पंतप्रधान मोदींच्या आदेशानंतर फडणवीस त्यांच्यावर कारवाई करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे हेही एका जुन्या वादामुळे अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिल्या जाणाऱ्या सवलतींवर बोलताना कोकाटे यांनी केलेल्या विधानाने मोठा वाद निर्माण झाला. भिकारीही एक रुपया घेत नाही आम्ही एक रुपयात पिक विमा देत आहोत, असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली. शेतकरी संघटनांनी तीव्र आंदोलनाची तयारी दाखवली होती. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींनी “प्रशासन स्वच्छ आणि जबाबदार असावे” असे स्पष्ट आदेश दिल्यामुळे कोकाटे यांनाही राजकीय फटका बसण्याची शक्यता आहे.

मंत्र्यांचे राजीनामे येणार?

पंतप्रधान मोदींच्या स्पष्ट भूमिकेमुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून कळते. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर आरोप सिद्ध झाल्यास त्यांना मंत्रीपद गमवावे लागू शकते. विशेष म्हणजे, भाजपच्या अंतर्गत गोटातही या कारवाईची चर्चा सुरू आहे.

राज्यातील महायुती सरकार आता मोठ्या कसोटीवर आहे. विरोधकांनी आधीच सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असताना, आता स्वतः पंतप्रधान मोदींनीच कडक भूमिका घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा लवकरच घेतला जातो का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!