महाराष्ट्र

Narendracharya Maharaj : नागरिकांच्या संतापाच्या लाटेत विजय वडेट्टीवार

Maharashtra : साधू-संतांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने काँग्रेस नेत्या विरोधात राज्यभर जनाक्रोश

Author

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या वादग्रस्त वक्तव्यामुळे अमरावतीत मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले.

विजय वडेट्टीवार यांचा संतप्त भक्तांनी कडाडून निषेध नोंदवत तात्काळ माफीची मागणी केली आहे. तसे न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर मुंबई, पुणे, नाशिक, पंढरपूर आणि अमरावतीसह राज्यभरातील विविध भागांत भक्तगण आणि समर्थक महत्त्वाच्या ठिकाणी निषेध रॅली आणि रास्ता रोको आंदोलन करत आहेत.

नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर समर्थक रस्त्यावर उतरले. संविधान चौकात संतप्त भक्तांनी वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. नागपुरात घोषणाबाजीने परिसर दणाणला. काही आंदोलकांनी वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला काळे फासून आपला रोष व्यक्त केला.

Parinay Fuke : जिल्हा मजूर संघावर संघर्ष पॅनलचं वर्चस्व

भक्तांनी घेरले

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या भक्तगणांनी राज्यभरात जोरदार आंदोलन छेडले आहे. या आंदोलनात वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला. भक्तगणांनी “विजय वडेट्टीवार माफी मागा” अशा जोरदार घोषणा दिल्या.

पंढरपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकातही संतप्त भक्तांनी आंदोलन करत वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. समर्थकांनी विजय वडेट्टीवार यांना तातडीने माफी मागण्याचा इशारा दिला, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

काय म्हणाले होते वडेट्टीवार?

भाजपने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक साधू-संतामुळे जिंकली, असा दावा नरेंद्र महाराज यांनी केला. याविषयीचा प्रश्न वडेट्टीवार यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले, “नरेंद्र महाराज याला कुठले दिव्य स्वप्न पडले माहिती नाही. राज्यात साधू-संतामुळे ही निवडणूक जिंकली म्हणणे म्हणजे महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान आहे. कारण, त्याला धार्मिक स्वरुप देऊन ध्रुवीकरण करत असतील तर ते साधू-संत नाहीत. संताची शिकवण सर्व समाजाला एकत्र घेऊन समाजाची उन्नती, प्रगती साधणे आणि समाज घडवणे असतो, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनीही विजय वडेट्टीवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. संग्राम जगताप म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळी वोट जिहाद झाला. त्यावेळी या लोकांची थोबाडं शिवली होती का? त्या वेळेला फतवे निघत होते, तेव्हा हे काही बोलले नाहीत. मात्र आता हिंदू धर्माच्या विरोधात बोलत आहेत. भगवा ध्वज हा काही लोकांच्या मनाला सलतो आहे आणि काही संघटना यासाठी हेतुपुरस्सर काम करत आहेत, असा घणाघात जगताप यांनी केला.

तीव्र आंदोलन

सध्या विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण प्रकरणावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र, त्यांच्यावरील वाढता रोष पाहता ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भक्तगण आणि समर्थक विजय वडेट्टीवार यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा अधिक तीव्र आंदोलनाचा सामना करावा लागेल, असा इशारा देत आहेत.

या प्रकरणामुळे काँग्रेस पक्षावरही दबाव वाढला आहे. जर वडेट्टीवार यांनी यावर तातडीने प्रतिक्रिया दिली नाही, तर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय वर्तुळात आणि धार्मिक स्तरावर हे प्रकरण चांगलेच गाजत असून पुढे काय होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!