
काँग्रेसने सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाच्या पुनरुज्जीवनासाठी भव्य सद्भावना पदयात्रेचे आयोजन केले आहे.
काँग्रेसची सद्भावना पदयात्रा ही महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाच्या पुनरुज्जीवनासाठी आणि सामाजिक सलोखा, बंधुभाव व सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी एक ऐतिहासिक चळवळ आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील हा भव्य उपक्रम राज्याच्या गौरवशाली परंपरांना पुनर्स्थापित करून बंधुभाव दृढ करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाला नवचैतन्य देण्यासाठी काँग्रेस पक्षाने ‘सद्भावना पदयात्रे’ चे भव्य आयोजन केले आहे. सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि महाराष्ट्र धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी 8 मार्च रोजी बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथून या ऐतिहासिक यात्रेचा शुभारंभ होणार आहे. या यात्रेद्वारे दोन दिवसांत तब्बल 51 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत 9 मार्च रोजी बीड शहरात सद्भावना मेळाव्याने यात्रेचा समारोप केला जाणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा करत सांगितले की, महाराष्ट्राला महापुरुषांचा आणि संतांचा महान वारसा लाभला आहे, परंतु मागील काही दिवसांत राज्यातील सामाजिक वातावरण बिघडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सामाजिक ऐक्य आणि परस्पर सौहार्द वृद्धिंगत करण्यासाठी काँग्रेसने ही यात्रा आयोजित केली आहे.

ऐक्यासाठी साकडे
पदयात्रा भगवानगड आणि नारायणगड येथे वंदन करून सद्भावनेसाठी साकडे घालून सुरु केली जाणार आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा लक्षात घेऊन सद्य परिस्थितीत बंधुभाव आणि सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी काँग्रेसचा हा प्रयत्न असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की,इंग्रजांच्या जुलमी राजवटीपासून देशाला मुक्त करताना केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हे, तर समाजव्यवस्थेचे परिवर्तन हेही आमचे ध्येय होते, पक्षाच्या डीएनएमध्येच समाजवाद आणि सामाजिक समरसता आहे. जात-पात, धर्मभेद यापेक्षा माणुसकीला प्राधान्य देण्याची परंपरा काँग्रेसने जपली आहे. त्यामुळेच, सध्याच्या सामाजिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी ही यात्रा महत्वपूर्ण ठरणार आहे.
विषमतेविरोधात ठोस भूमिका
बीड जिल्ह्यातील स्त्री-पुरुष लोकसंख्येच्या गुणोत्तरातील मोठ्या तफावतीची दखल घेत काँग्रेसने जागतिक महिला दिनाच्या दिवशीच सद्भावना पदयात्रेचा शुभारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. बीड जिल्हा स्त्री भ्रूणहत्येसाठी चर्चेत राहिलेला आहे, त्यामुळेच महिलांचे हक्क, समानता आणि सामाजिक न्याय यासाठी काँग्रेसने या जिल्ह्याची निवड केली.यात्रेत तरुण, महिला, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, पत्रकार आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत, ही इच्छा आहे. सद्यस्थितीत समाजामध्ये निर्माण झालेली दुही दूर करून नव्या सामाजिक सलोख्याचा पाया रचण्याचा आमचा मानस असल्याचे सपकाळ म्हणाले.
Administration Failure : समस्यांचा पहाड उचलण्यासाठी अकोल्याला ‘बाहुबली’ची गरज
काँग्रेसचा संकल्प
यात्रा केवळ राजकीय उपक्रम नसून, महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्द आणि एकात्मतेसाठी एक व्यापक जनआंदोलन आहे. राज्याच्या विविध भागांमध्येही अशाच प्रकारच्या यात्रांचे आयोजन करण्याचा काँग्रेसचा मानस आहे. परभणी आणि इतर जिल्ह्यांमध्येही लवकरच अशा यात्रांचे नियोजन होणार असल्याची माहिती सपकाळ यांनी दिली. आज महाराष्ट्रात काही लोक आपल्या स्वार्थासाठी समाजात दुही पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे राज्याच्या हिताचे नाही. महाराष्ट्राच्या महान परंपरेला कलंक लावणाऱ्या अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी आणि सर्वधर्मसमभावाचा खरा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सद्भावना पदयात्रा निघत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
संघटनात्मक बळकटपणा
सद्भावना यात्रेच्या तयारीसाठी टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली. या बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी कुणाल चौधरी, खा. कल्याण काळे, प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत संघटनात्मक बळकटी, आगामी रणनिती आणि सद्भावना यात्रेच्या यशस्वी आयोजनावर चर्चा झाली. तसेच मंगळवारी, 25 फेब्रुवारी रोजी काँग्रेस प्रदेश पदाधिकाऱ्यांची विशेष बैठकही आयोजित करण्यात आली आहे.
काँग्रेसचा निर्धार
सद्भावना पदयात्रा ही सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरणार असून, महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सामाजिक वारशाला नव्याने उजाळा देणार आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली बंधुभाव, समानता आणि सामाजिक न्यायाचा लढा आणखी पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला आहे. महाराष्ट्राने शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा, शाहू-फुले-आंबेडकरांच्या सामाजिक समतेचा आणि संत परंपरेच्या मानवतावादी विचारांचा वारसा जोपासला आहे. काँग्रेसने तोच वारसा पुढे नेण्याची जबाबदारी घेतली असून, सद्भावना पदयात्रा हा त्याच दिशेने एक भक्कम पाऊल आहे.