
रेल्वे वाहतूक वेगवान व सुरक्षित करण्यासाठी स्वयंचलित सिग्नलिंग बसवण्यात आले आहे. यामुळे रेल्वे गाड्यांचा होणारा खोडांबा टाळेल आणि वेग वाढेल. प्रवासी आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात आधुनिकतेकडे वाटचाल करत, अकोला-वरणगाव दरम्यान 90.45 किलोमीटरचा स्वयंचलित सिग्नलिंग प्रकल्प प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आला आहे. विशेषतः मलकापूर – बिस्वा ब्रिज (14.02 किलोमीटर) दरम्यान स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली 24 फेब्रुवारीपासून पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. यामुळे गाड्यांच्या हालचालींना अधिक वेग येणार असून, गाड्यांचा खोळंबा टाळला जाईल.
या अत्याधुनिक सिग्नलिंग प्रणालीमुळे रेल्वे मार्गावरील वाहतुकीची क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे. या सिग्नलिंग यंत्रणेमध्ये प्रत्येक 1 किलोमीटर अंतरावर सिग्नल बसवले गेले आहेत, तर काही ठिकाणी 400 मीटरच्या अंतरावरही सिग्नल बसवले गेले आहेत. याचा थेट परिणाम म्हणजे, एका गाडीने सिग्नल पार करताच दुसऱ्या गाडीला मार्ग मोकळा होईल. परिणामी अधिक गाड्या वेळेवर आणि वेगाने धावू शकतील.

Vijay Wadettiwar: अनधिकृत रिसॉर्टवर महसूल अधिकाऱ्यांची रंगीन पार्टी
महत्त्वपूर्ण पाऊल
मलकापूर – बिस्वा ब्रिज या 14.02 किलोमीटर मार्गावरील स्वयंचलित सिग्नलिंगमुळे भुसावळ – शेगाव नियंत्रण बोर्ड पूर्णतः स्वयंचलित झाला आहे. यामुळे वरणगाव – अकोला मार्गावर 90.45 किलोमीटरचे स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आले आहे. ही यंत्रणा रेल्वे गाड्यांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि प्रवासी तसेच मालवाहतुकीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
मलकापूर – बिस्वा ब्रिज मार्गावरील नव्याने स्थापित स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली ही अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. 21 नवीन स्वयंचलित सिग्नल आणि 10 सेमी-स्वयंचलित सिग्नल बसवले आहेत. एमएसडीएसी (Multi Section Digital Axle Counter) प्रणालीचा समावेश आहे. रिअल-टाइम मॉनिटरिंग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 48 कोर ऑप्टिकल फायबर केबल आणि यूएफएसबीआय प्रणालीचा समावेश आहे. रेल्वे स्थानके “ऑटो हट” प्रणालीत परिवर्तित करण्यात आले आहेत. इलेक्ट्रॉनिक लॉगिंग उपकरणे व आरडीएसओ मान्यताप्राप्त अग्नि अलार्म सिस्टम सक्रिय करण्यात आली आहे.
मोठा दिलासा
स्वयंचलित सिग्नलिंगमुळे भुसावळ – बडनेरा मार्गावरील रेल्वे वाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणात सुधारली जाणार आहे. रेल्वेस्थानकादरम्यान दर 1 किलोमीटर अंतरावर सिग्नल बसवले असल्याने रेल्वे गाड्यांना अधिक वेग मिळणार. त्यामुळे गाड्यांचा खोळंबा कमी होऊन वेळेची बचत होणार आहे. कमी वेळात जास्त गाड्या चालवणे शक्य होईल. परिणामी प्रवाशांना आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.
चालू आर्थिक वर्षात मध्य रेल्वेवर एकूण 58.32 रूट किलोमीटरवर स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली यशस्वीरित्या बसवण्यात आली आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या संपूर्ण मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक अधिक सुकर आणि अचूक होईल.
ही अत्याधुनिक सिग्नलिंग प्रणाली रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित, वेगवान आणि विश्वासार्ह करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मध्य रेल्वेच्या या आधुनिक प्रकल्पामुळे प्रवाशांना अधिक जलद आणि वेळेवर पोहोचणाऱ्या गाड्यांचा लाभ मिळणार असून, संपूर्ण भुसावळ विभागातील रेल्वे वाहतूक एक नवा वेग घेणार आहे.