
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी विधिज्ञ उज्वल निकम विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या खळबळजनक हत्याकांडाच्या तपासाला गती देण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा मिळावी म्हणून महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामांकित विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच अॅड. बाळासाहेब कोल्हे यांना सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
फडणवीस यांनी या नियुक्तीचा आदेश सोशल मीडियावर शेअर करत माहिती दिली. या निर्णयामुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोग गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या प्रकरणात निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी देशमुख कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी सातत्याने केली होती. अखेर सरकारने त्यांची ही महत्त्वाची मागणी मान्य केली आहे.

Amol Mitkari : मंत्र्यांच्या ओएसडीनेच मागितली लाखो रुपयांची लाच
न्यायासाठी मोठे पाऊल
उज्ज्वल निकम हे देशातील सर्वोच्च विधिज्ञांपैकी एक मानले जातात. त्यांनी अनेक हाय-प्रोफाईल खटले लढले असून, 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटला आणि 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. विशेषत: दहशतवादी अजमल कसाबला फासावर चढवण्यात निकम यांची भूमिका निर्णायक ठरली होती. त्यामुळेच, संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांची निवड झाल्याने आरोपींना कठोर शिक्षा होण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याचे सहकारी यांच्यासाठी हा धक्कादायक निर्णय ठरला आहे. केज तालुक्यातील आवादा कंपनीकडून मागितलेल्या खंडणीच्या वादातून 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली. तसेच मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याने आत्मसमर्पण केले आहे. त्याच्यावर मकोका अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.
धनंजय मुंडेंचा राजीनामा
संतोष देशमुख या हत्याकांडातील आरोपींच्या संबंधांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. वाल्मिक कराड हा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने या प्रकरणाचा तपास पूर्णतः निष्पक्ष व्हावा, यासाठी मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच एसआयटी नेमून या प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या मागणीसाठी संतोष देशमुख यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू केले होते.
धनंजय देशमुख यांनी सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ही समाधानाची बाब आहे, पण आंदोलन केल्यानंतरच सरकार मागण्या मान्य करत आहे, ही दुर्दैवी गोष्ट आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा, यासाठी त्यांचे कुटुंबीय आणि गावकरी सातत्याने लढा देत आहेत. बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी देखील या प्रकरणाचा आढावा घेतला आणि आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली आहे.
एक आरोपी फरार
संतोष देशमुख यांच्या हत्येला 78 दिवस पूर्ण झाले असतानाही आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. त्यामुळे पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. याशिवाय, आंदोलकांनी सरकारला ठाम इशारा दिला आहे की, जर त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर उद्यापासून उपोषणकर्ते पाणी देखील ग्रहण करणार नाहीत.
अद्यापही या प्रकरणातील आरोपींना शिक्षा होण्यासाठी सरकार आता अधिक गंभीर झाले आहे. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती ही मोठी सकारात्मक पावले आहेत, पण अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. आता हे पाहावे लागेल की, न्यायासाठी सुरू असलेले हे आंदोलन कोणत्या टप्प्यावर जाऊन संपते आणि सरकार आणखी कोणते पावले उचलते.