महाराष्ट्र

Maharashtra Politics : शिंदेंच्या संकटांवर अमोल मिटकरींचा तडका 

Mahayuti : शिवसेनेच्या तीन मंत्र्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा आरोप

Author

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे फिक्सर अधिकाऱ्यांना डच्चू मिळाला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या कठोर निर्णयाचे स्वागत करत अमोल मिटकरी यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या तीन नेत्यांवर आरोप केले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, ओएसडी आणि खासगी सचिवांची नियुक्ती करताना फिक्सर अधिकाऱ्यांना मंजुरी दिली जाणार नाही. त्यांच्या या भूमिकेनंतर फडणवीस यांनी 125 पैकी 109 अधिकाऱ्यांना मान्यता दिली असून, 16 संशयित फिक्सर अधिकाऱ्यांना थेट डच्चू दिला आहे. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आणखी खुलासा केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी स्वागत केले आहे. मिटकरी म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात तसेच शिंदे सरकारच्या सुरुवातीच्या टप्प्यात चार मंत्र्यांच्या ओएसडींनी मोठ्या प्रमाणात त्रास दिला, असे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अमोल मिटकरी यांनी सांगितले.

Maharashtra Politics : फडणवीसांच्या शिस्तीने धास्तावले शिंदे 

गंभीर आरोप

अमोल मिटकरी यांनी माजी मंत्री आणि विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांच्या ओएसडीवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांच्या मते, भुमरे यांच्या ओएसडीने तब्बल 5 कोटी रुपयांच्या कामासाठी 5 लाखांची लाच मागितली होती. यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यास संदीपान भुमरे यांनी स्पष्ट नकार दिला. मात्र, हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही. मिटकरी यांनी आता आणखी तीन माजी मंत्र्यांच्या ओएसडींवर देखील गंभीर आरोप लावले आहेत.

मिटकरी यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकाळात तसेच शिंदे सरकारमध्ये माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, माजी मंत्री संजय राठोड आणि माजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ओएसडींनीही गैरव्यवहार केल्याचा दावा केला आहे. या अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळेच तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांना नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.

Indrajit Sawant: नागपुरात मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

घोटाळे उघड

अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या निवडीदरम्यान मोठा आर्थिक व्यवहार झाला होता. अमोल मिटकरी यांच्या दाव्यानुसार, तत्कालीन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे ओएसडी विवेक मोगल यांनी या निवडीदरम्यान मोठी आर्थिक देवाणघेवाण केली आणि विदर्भातील विद्यापीठांवर बाहेरच्या लोकांची नियुक्ती केली.

मिटकरी यांनी सत्ताधारी आमदारांवरही टीका करताना, आपल्या मतदारसंघात हजारो कोटींची विकासकामे केल्याचा दावा करणाऱ्या आमदारांनी हे पैसे कुठून मिळवले? हा निधी त्यांना कसा मिळतो? असा सवाल उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलेल्या या कठोर निर्णयानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे अनेक ओएसडींच्या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आगामी काळात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

Santosh Deshmukh Case : हायप्रोफाईल वकील उज्ज्वल निकम यांची एंट्री

मोठे संकट

अमोल मिटकरी यांच्या या आरोपांमुळे महायुती सरकारमध्ये मोठा भूकंप येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फडणवीसांनी 16 अधिकाऱ्यांना डच्चू देऊन भ्रष्ट कारभाराविरोधात कठोर भूमिका घेतली असली तरी, अजूनही काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी काळात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी नवे संकट उभे राहू शकते.

एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांच्या शिस्तीमुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे धाव घेतल्याची माहिती समोर आली होती. फडणवीस यांच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांना दणका बसत आहे, असे चित्र दिसून येत आहे. यामुळे एकनाथ शिंदे संकटात सापडले आहेत, अशी चर्चा वर्तुळात सुरू आहे. तर अमोल मिटकरी यांच्या आरोपांमुळे शिंदे यांच्यावरील संकट आणखी प्रबळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून महायुतीतील अंतर्गत संघर्ष वाढू शकतो. त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!