
महाकुंभात स्नान न केल्याच्या आरोपावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जुंपली आहे. शिंदेंच्या टिकेला ठाकरेंनी सडेतोड उत्तर देत गद्दारीचा मुद्दा उचलला.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा धगधगत्या वादाचा भडका उडाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट हल्ला चढवत त्यांना गद्दार संबोधले. ‘कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही,’ असे घणाघाती विधान करत उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या हिंदुत्वाच्या गाजराला सडलेले म्हटले आहे.
प्रयागराजमध्ये नुकत्याच पार पडलेल्या महाकुंभ मेळ्याला शिंदे यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर टीका करत काहींनी हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला होता. मात्र, यावर प्रतिउत्तर देताना उद्धव ठाकरेंनी खळबळजनक विधान केले, ‘इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारायची’ गद्दारीला धर्माची झूल घालून ती स्वीकारली जाते का? हा महाराष्ट्र आहे, येथे ढोंगबाजी चालत नाही.’

Vidarbha : देवाभाऊच नव्हे; झिरवाळही करणार ‘दूध का दूध अन्..’
हिंदुत्वाच्या नावावर ढोंग
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन वर्षांपासून सतत हिंदुत्वाचा नवा फॉर्म्युला रचला जात आहे. मात्र, उद्धव ठाकरेंनी यावेळी तिखट शब्दांत शिंदेंच्या खेळाला आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. आज मी इथे बोललो की उद्या पेपरमध्ये छापून येईल की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले, त्यामुळे मी आजच सांगतो गर्व से कहो हम हिंदू हैं, पण अभिमानाने म्हणा मी मराठी आहे. शिवसेनेची स्थापना एका ठिणगीनं झाली, ज्या उपऱ्यांचे आक्रमण रोखायचे त्यांच्याशी हातमिळवणी करून तुम्ही आता गंगेच्या पाण्याने स्वतःला शुद्ध करणार?” असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
शिंदेंच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयावरून उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या जडणघडणीत मराठी माणसाचे अस्तित्व आहे. आम्ही नुसते हिंदुत्ववादी नाही, आम्ही स्वाभिमानी आहोत. कुठेही जाऊन उंबरठा झिजवून सत्ता मिळवणे, हे हिंदुत्व नाही अशा शब्दांत त्यांनी शिंदेंवर हल्लाबोल केला.
साहित्य संमेलनावरूनही टोला
उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच पार पडलेल्या साहित्य संमेलनावरही निशाणा साधला. हे संमेलन नक्की कशासाठी झालं? त्याचे अध्यक्ष जे विचार मांडत होते, ते ऐकून डोळे उघडायला हवेत. देशात त्या विचारांवर चर्चा व्हायला हवी, पण सध्या चर्चा होते ती केवळ राजकीय सोयीनुसार. माझे आजोबा आणि संमेलनाच्या अध्यक्षांचे विचार जुळतात, पण हे कुणाला चालत नाही. आपल्या देशाचं यान मंगळावर जातं आणि आपण मात्र अजूनही माणसाच्या पत्रिकेत मंगळ शोधत बसतो, असा खोचक टोला त्यांनी लगावला.