महाराष्ट्र

Devendra Fadnavis : खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात राजकीय कार्यकर्त्यांचा हात

Molestation Case : शिंदेंसमोर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले

Author

जळगाव येथे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने महिलांच्या सुरक्षेबाबत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नुकत्याच पुण्यातील तरुणीवरील अत्याचार प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अशात आता केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अल्पवयीन मुलीची छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे कोथळी गावातील यात्रा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीने तिच्या काही मैत्रिणींसोबत हजेरी लावली होती. यावेळी काही टवाळखोरांनी मुलींची छेड काढली. सुरुवातीला मुलींना टवाळखोरांकडून अश्लील शेरेबाजी करण्यात आली. सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आपली कृती सुरूच ठेवली. एवढेच नव्हे, तर आरोपींनी मुलींना धक्काबुक्की करण्याचा देखील प्रयत्न केला.

IPS Bachchan Singh : कागद करणार काळे अन् बंद होणार फालतू चाळे

पोलिसांची खरडपट्टी

छेडछाडच्या घटनेमुळे उपस्थितांमध्ये प्रचंड संताप उसळला. घटनेनंतर सुरक्षारक्षकांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे, या घटनेची माहिती मिळताच भाजपचे वरिष्ठ नेते तिथे पोहोचले आणि पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली. काही तासांतच आरोपींना अटक करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जळगावातील या धक्कादायक घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली. त्यांनी आरोपींना कोणतीही माफी दिली जाणार नाही असे स्पष्ट करत कठोर कारवाईचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी यावेळी असा इशारा दिला की, या प्रकरणात एका विशिष्ट राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामील आहेत. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.

कारवाईचा इशारा

महिलांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आरोपी कितीही ताकदवान असले तरी त्यांना सोडले जाणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. मात्र, फडणवीस यांनी थेट राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा उल्लेख केल्याने हे प्रकरण आणखीच तापण्याची चिन्हे आहेत.

घटनेनंतर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी थेट सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या नातीवर ओढावलेल्या प्रसंगावर बोलताना एकनाथ खडसे यांनी, राजकीय अभयामुळेच आरोपी इतके धाडसी झाले आहेत, असा थेट आरोप केला. मागील सरकारच्या काळातही या आरोपींविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, मुख्यमंत्री असताना शिंदेंनीच फोन करून त्यांना सोडण्याचे आदेश दिले होते, असा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी शिंदेंवर केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

आरोपी कोणाच्या छायेखाली?

सदर प्रकरणातील आरोपी हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे या घटनेला राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विशिष्ट राजकीय पक्षाचे पदाधिकारी आरोपींना अभय देत आहेत, असे सूचक वक्तव्य केले आहे.

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीचाच छेडछाडीचा प्रकार घडत असेल, तर सामान्य महिलांची सुरक्षा कशी असेल? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा किती गंभीर आहे, हे या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आले आहे.

वातावरण तापले

छेडखानीच्या घटनेनंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सरकारवर राजकीय दबाव टाकून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, महिलांच्या सुरक्षेचा विषय कोणत्याही परिस्थितीत हलक्यात घेतला जाणार नाही. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल. त्यांच्यावर कोणत्याही दबावाखाली निर्णय होणार नाही. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपींना ताब्यात घेतले आहे. मात्र, या प्रकरणात आणखी कोणत्या बड्या व्यक्तींचा संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.

ठोस पाऊल आवश्यक

महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोपींना कोणतीही राजकीय अभय न देता कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने आणखी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आता हे प्रकरण फक्त महिलांच्या सुरक्षेपुरते मर्यादित राहिले नसून, राजकीय रंग घेण्याची शक्यता आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!