
नागपूर महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा विस्फोट आज रस्त्यावर पाहायला मिळाला. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संतप्त नागपूरकरांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आक्रमक आंदोलन केले. मटका फोडत आणि जोरदार घोषणाबाजी करत मनपाच्या अपयशाचा पर्दाफाश करण्यात आला.
नागपूर महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा विस्फोट आज काँग्रेसच्या आंदोलनातून पाहायला मिळाला. शहरातील वाढत्या समस्या आणि मनपा प्रशासनाच्या निष्क्रियतेला कंटाळलेल्या नागरिकांनी आज काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आक्रमक आंदोलन करत मनपा कार्यालयासमोर मटका फोडत जोरदार निदर्शने केली. मनपाच्या विरोधात संतप्त घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
चार वर्षांपासून प्रशासकाच्या हातात असलेल्या नागपूर महानगरपालिकेने नागरिकांच्या समस्यांकडे पाठ फिरवली आहे. वाढती महागाई, बिघडलेली जलपुरवठा व्यवस्था, फुटलेल्या सांडपाणी वाहिनी पाइपलाइन आणि खड्डेमय रस्त्यांमुळे नागपूरकरांचे जीवन अधिकच दयनीय झाले आहे. आजच्या आंदोलनात काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी संतप्त घोषणाबाजी करत प्रशासनाच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केला.

नागपूरकर त्रस्त
शहरात 24 तास पाणीपुरवठा योजनेची घोषणा करण्यात आली असली तरी अनेक भागांत अद्यापही नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. कोणी पुरेसं पाणी मिळत नसल्याने त्रस्त आहे, तर काही ठिकाणी गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मनपाच्या अपयशामुळे उन्हाळ्याच्या तोंडावरच अनेक बस्त्यांमध्ये पाण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे. त्याचसोबत शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत भीषण बनली आहे. खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, वाहनचालकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला जात असला तरी तो योग्य ठिकाणी खर्च होतो का, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.
भ्रष्टाचार नागरिकांच्या माथी
गृहकर आणि जलकरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली असली तरी नागपूरकरांना कोणत्याही मूलभूत सुविधांचा लाभ मिळत नाही. नागरिकांकडून अधिकाधिक कर वसूल केला जात असताना, मनपाचे अधिकारी आणि ठेकेदार मात्र पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. मनपा प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे शहराचे चित्र अधिकच विदारक बनले आहे. शहराच्या विकासासाठी मिळणारा निधी चुकीच्या ठिकाणी वळवला जात असल्याने सामान्य नागरिकांना सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागपूरकरांना वाढत्या समस्या आणि आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे.
प्रशासन हादरले
काँग्रेसच्या आंदोलनानंतर प्रशासनाच्या गलथान कारभारावर प्रकाश पडला असून, नागपूरकरांचा रोष अधिकच तीव्र झाला आहे. संतप्त आंदोलकांनी मनपा कार्यालयासमोर मटका फोडून निषेध नोंदवला. या आंदोलनामुळे प्रशासनाच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मनपा प्रशासनाच्या अपयशामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आता संघर्षाची भूमिका घेतली असून, काँग्रेसच्या आंदोलनाने त्या रोषाला आणखी धार दिली आहे. नागरिकांना न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली असून, या आंदोलनाच्या लाटेमुळे मनपा प्रशासन हादरले आहे.