
अबू आझमी यांच्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रात संतापाचा भडका उडाला आहे.औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ चिखलीत शिवसेना कार्यकर्त्यांनी आझमींच्या पुतळ्याचे दहन केले.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाच्या काळातील जीडीपी 24 टक्के होता, असे विधान करून इतिहासाचा विकृतीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत चिखली येथे शिवसेना शिंदे गटाने आक्रमक आंदोलन केले. शिवसेना कार्यकर्त्यांनी आझमी यांच्या पुतळ्याचे दहन करत जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या विधानांना आता वाचा फोडली जाईल, असा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला.
आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनाचे उपजिल्हाप्रमुख शिवाजी देशमुख, युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, माजी तालुकाप्रमुख कपिल खेडेकर यांनी केले. शिवसेना शहरप्रमुख विलास घोलप यांच्या नेतृत्वाखाली हा संतप्त मोर्चा काढण्यात आला. मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

NCP AJ : प्रसिद्धीपत्रकातून राष्ट्रवादीची सफाई; मुंडेंचा हत्या प्रकरणाशी संबंध नाही
अपमान खपवणार नाही
शिवसेनेच्यावतीने स्पष्ट इशारा देण्यात आला की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड कुणीही करणार असेल, तर त्याचा जोरदार प्रतिकार केला जाईल. औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याला उगाचच महिमामंडित करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांनी केला. शिवसेनेचे शहरप्रमुख विलास घोलप म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या विरुद्ध जाणारे कोणतेही विधान आम्ही सहन करणार नाही. अबू आझमी यांचे विधान हा ऐतिहासिक सत्याचा अपमान आहे, आणि त्यांनी हे तातडीने मागे घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.
औरंगजेबावरून वातावरण तापले
अबू आझमी यांच्या वादग्रस्त विधानामुळे संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. इतिहासाचे विकृतीकरण करून एखाद्या जुलमी शासकाला मोठे करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असे शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त होऊन म्हणाले. त्यांच्या मते, औरंगजेबाच्या अत्याचारांनी हिंदू समाजाला प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या, आणि अशा क्रूरकर्म्याला आजच्या काळात उदात्तीकरण करणे म्हणजे इतिहासाचा घोर अपमान आहे. या आंदोलनात शिवसेनेचे उपशहर प्रमुख विठ्ठल जगदाळे, विकी नकवाल, राका मेहेत्रे, रामभाऊ देशमुख, पंजाब जावळे, बाळू खरात, राहुल शेलकर यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. परिसरात संतापाचे वातावरण होते आणि नागरिकही मोठ्या संख्येने आंदोलन पाहण्यासाठी उपस्थित होते.
तीव्र आंदोलनाचा इशारा
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिला की, जर अबू आझमी यांनी त्यांचे विधान मागे घेतले नाही, तर पुढील आंदोलन अधिक उग्र होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोणालाही माफ केले जाणार नाही. औरंगजेबासारख्या शासकाचे समर्थन करणाऱ्यांना महाराष्ट्रात स्थान नाही, असेही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितले. यामुळे चिखलीत काही काळ तणाव निर्माण झाला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा पाहता, हा विषय तातडीने हाताळण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांनीही सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव आणि त्यांचा इतिहास अबाधित राखण्यासाठी शिवसेनेने ठाम भूमिका घेतली असून, यापुढेही असे कुठलेही विधान खपवून घेतले जाणार नाही, हे आंदोलनाने स्पष्ट केले आहे.