
नागपूरचे माजी नगरसेवक बंटी शेळके यांनी काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली.
राजकारणाच्या रंगमंचावर नाना पटोले यांचा प्रवास एखाद्या नाटकासारखा आहे. कधी सत्तेच्या सुगंधी फुलासारखा चमकणारा, तर कधी पराभवाच्या वाऱ्याने गळून पडलेला. एकेकाळी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील सर्वेसर्वा असलेले नाना पटोले आता केवळ आमदार म्हणून मर्यादित राहिले आहेत. प्रदेशाध्यक्ष पद गमावल्यानंतर त्यांना पक्षाकडून कोणतीही मोठी जबाबदारी मिळालेली नाही. कधी काळी असं बोललं जात होतं की, काँग्रेस नानांना केंद्रीय पातळीवर मोठं पद देईल; पण त्या चर्चा आता धुळीला मिळाल्या आहेत. त्यामुळे नानांचा सध्याचा पत्ता मुक्काम पोस्ट सुकळी, जिल्हा भंडारा असाच आहे, जिथे ते शांतपणे आपलं राजकीय आयुष्य कंठत आहेत.
विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचा दारुण पराभव हा नानांच्या राजकीय प्रवासाचा टर्निंग पॉइंट ठरला. या पराभवाचं खापर त्यांच्यावर फोडलं गेलं आणि प्रदेशाध्यक्ष पदाची ताकद त्यांच्या हातून निसटली. पक्षानेही त्यांच्याकडे पाठ फिरवली. विरोधकांनीही त्यांना आता गंभीरपणे घेणं बंद केलं आहे. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांना बाजूला करत काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळ यांच्यासारख्या नव्या नेतृत्वाला संधी दिली. हर्षवर्धन, जे एकेकाळी राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते, आता पक्षात नवं वजन निर्माण करत आहेत. नाना पटोले यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला आहे.

Sandeep Joshi : गडकरींच्या गडात पराभव, देवभाऊंच्या पाठिंब्याने विधान परिषदेत कमबॅक
दोन चेहरे एकत्र
काँग्रेसच्या नव्या नेतृत्वात हर्षवर्धन सपकाळ यांना ‘बंटी’ या टोपणनावाने ओळखले जाते. विशेष म्हणजे, नागपूरमध्ये आणखी एक कार्यकर्ता, ऋषिकेश शेळके, यांनाही ‘बंटी शेळके’ म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच, आता काँग्रेसमध्ये दोन ‘बंटी’ एकत्र आल्याने नवे राजकीय समीकरण निर्माण होईल, अशी चर्चा रंगली आहे.
राजकारणात स्थित्यंतर हे अपरिहार्य असते. नाना पटोले यांची गाडी सध्या धीम्या गतीने असली, तरी भविष्यात ते पुन्हा संधी साधतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. विदर्भातील काँग्रेससाठी ही नवी घडामोड नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, काँग्रेसमधील हे दोन ‘बंटी’ आगामी काळात विरोधकांसाठी धोक्याची घंटा ठरतील का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पराभवाचं कारण
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने देशपातळीवर चांगली कामगिरी केली असली, तरी महाराष्ट्रात मात्र पक्षाला मोठ्या प्रमाणात पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभा निवडणुकीतही पक्षाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या परिस्थितीत, काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष पदासाठी नवीन चेहरा पुढे केला.
नाना पटोले यांच्या जागी आता हर्षवर्धन सपकाळ यांना संधी देण्यात आली आहे. हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधींच्या जवळचे समजले जातात. आता त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्याभोवती गोळा होताना दिसत आहेत.