महाराष्ट्र

Vikas Thakre : नागपुरात सरकारी जमिनींचा खुलेआम सौदा

Nagpur : विकास ठाकरे यांनी केली मनपाची पोलखोल

Author

नागपुरात सरकारी जमिनींची लूट सुरू आहे. मनपा आणि एनआयटीच्या आशिर्वादाने बिल्डर मोकाट सुटले आहेत. गरीबांना हक्काच्या जमिनींसाठी संघर्ष करावा लागत असताना, प्रभावशाली लोक अनधिकृतरीत्या सरकारी मालमत्ता बळकावत आहेत.

नागपुरातील सरकारी जमिनींवर अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी) यांच्यावर थेट आरोप केले. बिल्डर मोकाट सुटले असून, सरकारी जमिनींवर कब्जा करून अनधिकृत बांधकामे करत आहेत, आणि प्रशासन त्यांना पाठिशी घालत असल्याचे त्यांनी म्हटले.

शुक्रवारी विधानसभेत या मुद्द्यावर बोलताना ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. खेळाच्या मैदानांवर अनधिकृतरीत्या बिल्डरांनी कब्जा केला आहे, आणि प्रशासन त्यांच्या बांधकामांना नियमित करत आहे, असा आरोप त्यांनी केला. हे करत असताना नागपूर मनपा आणि एनआयटीने गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांच्या जमिनीच्या नियमितीकरणाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. शेकडो गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबे आपले प्लॉट वैध करण्यासाठी झगडत आहेत, पण त्यांना डावलले जात आहे,असे ठाकरे म्हणाले.

Vidarbha : गडचिरोलीच्या काळोख्या भूतकाळाला शिंदेंनी दिला विकासाचा उजाळा

फेरीवाल्यांवर अत्याचार

नागपुरात सरकारी जमिनींवर प्रभावशाली लोकांनी कब्जा केला असून, प्रशासन केवळ डोळेझाक करत आहे. नागपूर सुधार प्रन्यास आणि महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे सरकारी मालमत्ता माफियांच्या घशात घातली जात आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.ठाकरे यांनी प्रशासनाच्या दुहेरी धोरणावरही हल्लाबोल केला. गरीब फेरीवाल्यांचे सामान मनपा जप्त करते, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात, त्यांना मारहाण केली जाते, पण करोडो रुपयांच्या सरकारी जमिनी बळकावणाऱ्या बिल्डरांना मात्र सन्मानाने वागवले जाते,अशी जहरी टीका त्यांनी केली. नागपूर महानगरपालिका फक्त शक्तिशाली लोकांची गुलामगिरी करत असून, सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असे ठाकरे म्हणाले.

सरकारी जमिनी लिलावात

नागपूरमध्ये गेल्या काही वर्षांत सरकारी जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. ठाकरे यांनी आरोप केला की, मनपा आणि एनआयटी स्वतःच बिल्डरांच्या बाजूने उभी आहे, त्यामुळेच नागपुरातील सरकारी जमिनी बेकायदेशीर विकल्या जात आहेत. प्रशासनाचे अधिकारी आणि बिल्डर यांच्या साटेलोट्यामुळे सामान्य जनतेच्या हक्काच्या जमिनीही बळकावल्या जात आहेत. सरकार आणि प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली असून, अन्यथा मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा गंभीर इशारा ठाकरे यांनी दिला आहे. नागपुरातील नागरिकांवर अन्याय होऊ नये, यासाठी त्यांनी सर्वसामान्य नागरीकांनीही एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

भ्रष्ट कारभार

नागपुरातील सरकारी जमिनींवर सुरू असलेल्या साटेलोट्यामुळे हजारो गरीब आणि मध्यमवर्गीय नागरीक वंचित राहिले आहेत. या प्रकरणात लवकरच सरकारने ठोस कारवाई केली नाही, तर हे अतिक्रमण आणि जमिनींचा गैरव्यवहार नागपुरातील सर्वसामान्यांसाठी विनाशकारी ठरेल, असे बोलले जात आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!