महाराष्ट्र

Nagpur : रेकीचा रईस जामिनासाठी कोर्टात 

RSS : संघ मुख्यालयाच्या सावटात दहशतीची छाया

Author

संघ मुख्यालयाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा घाला, दहशतवाद्याची रेकी आणि जामिनासाठी धडपड सुरू आहे. नागपूर ATSने काश्मीरहून अटक केलेल्या रईस शेखने न्यायालयात अर्ज दाखल करत नवा वाद निर्माण केला आहे.

नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची आणि स्मृती मंदिर परिसराची रेकी केल्याचा गंभीर आरोप असलेल्या रईस शेख या दहशतवाद्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या घटनेने पुन्हा एकदा संघ मुख्यालयाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. नागपूर दहशतवाद विरोधी पथकाने काश्मीरमधून रईस शेखला अटक केली होती, मात्र आता तो जामिनावर सुटण्याच्या प्रयत्नात आहे.

सप्टेंबर 2021 मध्ये गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीच्या आधारे काश्मीर पोलिसांनी रईस शेखला अटक केली. चौकशीत उघडकीस आले की, जुलै 2021 मध्ये त्याने नागपुरात येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची आणि स्मृती मंदिराची रेकी केली होती. तो सरळ काश्मीरहून नागपुरात येण्याऐवजी श्रीनगर-दिल्ली-मुंबई असा वळसा घालून नागपुरात पोहोचला होता. स्थानिक हॉटेलमध्ये राहून, रिक्षाने दोन्ही ठिकाणांची टेहळणी करून, छायाचित्रण करून तो परत काश्मीरला गेला. त्याने हे सर्व फोटो आणि माहिती पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्याला पाठवल्याचे तपासात समोर आले आहे.

Nagpur Zilla Parishad : तंत्रज्ञानाच्या दिशेने दमदार पाऊल

सुरक्षेच्या दुर्लक्षाची पुनरावृत्ती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय हे देशातील सर्वांत संवेदनशील ठिकाणांपैकी एक आहे. 2006 मध्ये देखील दहशतवाद्यांनी संघ मुख्यालयावर हल्ल्याचा कट रचला होता. 2014 मध्ये भाजप केंद्रात सत्तेवर आल्यानंतर संघाच्या राजकीय महत्त्वात वाढ झाली असून, त्याच्या सुरक्षेवर विशेष लक्ष द्यावे लागत आहे. मात्र, जुलै 2021 मध्ये रईस शेखने इतक्या सहजपणे संघ मुख्यालयाची रेकी केली आणि त्याची कोणालाही खबर लागली नाही, हे धक्कादायक आहे. यावरून सुरक्षा यंत्रणांची ढिसाळ व्यवस्था आणि गुप्तचर प्रणालीतील त्रुटी स्पष्ट होतात.

न्यायव्यवस्थेवर दबावाचा प्रयत्न

रईस शेखविरोधात गंभीर पुरावे असताना त्याने जामिनासाठी अर्ज दाखल करणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. त्याच्या अटकेनंतर नागपूर पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी काश्मीरला जाऊन चौकशी केली होती. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून नागपूर ATSने त्याला ताब्यात घेतले. असे असतानाही त्याचा जामिनासाठी प्रयत्न हा न्यायव्यवस्थेवर दबाव टाकण्याचा कट असल्याचा आरोप केला जात आहे.

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

संघ मुख्यालयाला सातत्याने दहशतवादी हल्ल्यांचा धोका असताना सुरक्षेत वारंवार त्रुटी आढळून येतात. हा मुद्दा केवळ संघाशी संबंधित नसून संपूर्ण देशाच्या सुरक्षेशी निगडित आहे. अशा घटनांमध्ये केवळ आरोपींना अटक करून प्रकरण थांबवणे हा उपाय होऊ शकत नाही. जर सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ कठोर उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात आणखी गंभीर संकट उभे राहू शकते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!