महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आपल्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात होळी साजरी केली. या निमित्ताने त्यांनी राज्याच्या विकासाचा संकल्प व्यक्त करत नागरिकांना एकतेचा आणि पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेश दिला.
संपूर्ण देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात होळीचा जल्लोष सुरू आहे. हा रंगोत्सव केवळ आनंद आणि उत्साहच नव्हे, तर एकता आणि बंधुभावाचं प्रतीकही आहे. भारताच्या विविध प्रांतांमध्ये होळी साजरी करण्याच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. उत्तर भारतात लठमार होळी प्रसिद्ध आहे, तर पश्चिम भारतात धुलीवंदन आणि रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महाराष्ट्रातही हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. धुलीवंदनाच्या दिवशी जुने गोंधळ, मतभेद आणि कटुता विसरून लोक एकमेकांना रंग लावून प्रेम आणि ऐक्याचा संदेश देतात. अगदी राजकीय वर्तुळातही याचा प्रभाव दिसून येतो.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात होळी साजरी करत नागरिकांना शुभेच्छा दिल्या. ठाण्याच्या किसन नगरमध्ये पारंपरिक उत्साहाने होळी पेटवून आनंद साजरा करण्यात आला. शिंदे यांनी सांगितले की, ‘माझी सुरुवातच किसन नगरपासून झाली आहे, त्यामुळे या ठिकाणी होळी साजरी करण्यास मला नेहमीच आनंद होतो. आमच्या कार्यकर्त्यांसोबत आणि स्थानिक नागरिकांसोबत होळी साजरी करण्याची परंपरा आहे. त्यांनी यावेळी महाराष्ट्राच्या विकासाचा उल्लेख करत सांगितले की, ‘गेल्या अडीच वर्षांत आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी विविध योजना आणल्या. लोकांच्या जीवनात आनंदाचे, समृद्धीचे रंग भरण्याचे कार्य आम्ही केले आहे आणि ते पुढेही करत राहू. महाराष्ट्रावरचे सर्व संकट आणि दुःख या होळीच्या ज्वाळेत जळून जावे, अशी मी मनःपूर्वक प्रार्थना करतो.
पर्यावरणपूरक होळीचे आवाहन
होळीच्या निमित्ताने शिंदे यांनी पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचे आवाहन केले. होळीच्या सणात ज्या रासायनिक रंगांचा वापर होतो, त्याचा पर्यावरणावर व आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक रंगच वापरले जावेत. धुळीवंदन आणि रंगपंचमीच्या निमित्ताने प्रदूषणमुक्त आणि हरित सण साजरा करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, आपला सण हा निसर्गाचा सन्मान करणारा असावा. तसेच, होळीमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर टाळावा आणि इको-फ्रेंडली होळी साजरी करावी. महाराष्ट्र सरकारने याबाबत जनजागृती केली आहे आणि नागरिकांनी त्याला प्रतिसाद द्यावा.
Dilipkumar Sananda : जब तक जिंदा हूं, काँग्रेस का परिंदा हूं
राजकीय रंगही उधळले
होळी हा एकतेचा सण असला तरी राजकारणाच्या रंगांनीही तो रंगलेला असतो. एकनाथ शिंदे यांनी या सणाच्या निमित्ताने विरोधकांनाही शुभेच्छा दिल्या. ‘बुरा ना मानो, होली है’ असं म्हणत विरोधकांनीही चांगले बोलावे, सकारात्मक राजकारण करावे आणि महाराष्ट्राच्या विकासात योगदान द्यावे,’ असा संदेश त्यांनी दिला.
महायुती सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक योजना आणल्या आहेत. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि संपूर्ण टीम सातत्याने मेहनत घेत आहे. त्यामुळे विरोधकांनीही विकासाचं गाणं गायला हवं, असे सांगत त्यांनी एकतेचा आणि सहकार्याचा संदेश दिला.
