
महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात तडा जात आहे. जणू होळीच्या अग्नीसारखी हळूहळू महाविकास आघाडीचीही आग विझत आहे, असे दृश्य आहे. अशाच आता नाना पटोले यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. अनेक नेते महाविकास आघाडीचा रंग सोडून महायुतीच्या रंगात रंगत आहेत. अशात आता होळीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी एक मोठी राजकीय ऑफर दिली आहे. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
नाना पटोले यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाविकास आघाडीकडे येण्याचे आमंत्रण दिले आहे. विशेष म्हणजे, पटोले यांनी दोघांनाही मुख्यमंत्रिपदाची ग्वाही दिली आहे. तुम्ही महाविकास आघाडीत या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ आणि मुख्यमंत्री करू,” असे मोठे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.

अवस्था बिकट
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याच वेळी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या राजकीय भविष्यावर टांगती तलवार आहे. त्यांच्या पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. भाजपच्या सोबत राहणे म्हणजे राजकीय आत्महत्या करण्यासारखे आहे, असे पटोले म्हणाले.
पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप करत म्हटले, ”
भारतीय जनता पक्ष ज्या पक्षांबरोबर युती करतो, त्यांना संपवण्याचे काम करतो. आपण पाहतच आहात की, भाजपने चिमणी यांनी सुरू केलेल्या अनेक योजना बंद केल्या आहेत. त्यामुळे त्यांची अवस्था बिकट झाली आहे. शिंदे आणि पवार यांनी सावध राहिले पाहिजे.
दोघांनाही बनवू मुख्यमंत्री
राज्याच्या राजकीय गणितात मोठा बदल होऊ शकतो, असे सूचित करताना पटोले म्हणाले, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ओढ आहे आणि अजित पवार यांना यांनाही सत्ता हवी आहे. त्यामुळे आम्ही एकाला काही काळ मुख्यमंत्री करू आणि दुसऱ्याला त्यानंतर संधी देऊ. पटोले यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. आता शिंदे आणि पवार या दोघांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महायुतीतील नेते यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.