
नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. त्यामुळे महायुतीत अस्वस्थता वाढली आहे. आता विजय वडेट्टीवार यांनी या राजकीय वादळाला नवीन वळण दिले आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय पटावर सध्या मोठे उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. महायुतीतील तीनही प्रमुख पक्षांमध्ये प्रवेशाची स्पर्धा रंगली आहे, तर विरोधी पक्षांनीही आपली रणनीती मजबूत करायला सुरुवात केली आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काँग्रेसमध्ये आलात तर मुख्यमंत्री बनवू, अशी ऑफर दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर आता काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत नवा सस्पेन्स निर्माण केला आहे.
धुलिवंदनाच्या दिवशी साऱ्यांनी एकमेकांना रंग लावले. पण नाना पटोलेंनी मात्र राजकीय रंग भरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण केला. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना काँग्रेससोबत यायची ऑफर दिली. एवढेच नव्हे, तर “त्यांना आलटून पालटून मुख्यमंत्री करू,” असेही मिश्कीलपणे सांगितले. प्रथमदर्शनी हे विधान गंमतीशीर वाटले असले, तरी त्याचे राजकीय पडसाद संपूर्ण राज्यभर उमटू लागले आहेत.

घाई करत आहेत
नाना पटोले यांच्या या ऑफरवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले. मी माध्यमांमधून ऐकले की नाना पटोले यांनी शिंदे आणि अजित पवार यांना ऑफर दिली आहे. खरं पाहता, राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. सध्या महायुतीमध्ये जे काही सुरू आहे, ते पाहता केव्हा काय होईल हे सांगणे कठीण आहे,” असे वडेट्टीवार यांनी म्हणाले.
वडेट्टीवार यांनी महायुतीच्या अंतर्गत कुरघोडीवरही भाष्य केले. महायुती सत्तेवर असली तरी नाराजी ठिकठिकाणी आहे. एकमेकांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील काळात हा असंतोष अधिक वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कोण कोणाच्या सोबत जाईल, हे सांगता येणार नाही. मात्र, नाना पटोलेंनी ऑफर देण्यात थोडी घाई केली असे म्हणता येईल,” असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सस्पेन्स निर्माण केला आहे.
वाढता असंतोष
सत्ताधारी महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद स्पष्ट दिसू लागले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत नाराजी वाढत आहे. दुसरीकडे, भाजपही स्वतःच्या हिताचा विचार करत असल्यामुळे शिंदे गटावर दडपण आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे पुढील काळात राज्याच्या राजकारणात नवे समीकरण पाहायला मिळू शकते.
महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वी अनेक धक्कादायक घडामोडी झाल्या आहेत. 2019 मध्ये पहाटेच्या शपथविधीपासून ते शिवसेनेच्या फाटाफुटीपर्यंत अनेक अनपेक्षित निर्णय झाले. त्यामुळे येत्या काळात आणखी कोणता नवा राजकीय प्रयोग घडणार, हे सांगता येणार नाही.
नाना पटोलेंनी दिलेली ऑफर गंभीरपणे घ्यायची की नाही, हे शिंदे आणि पवार यांच्यावर अवलंबून आहे. मात्र, या संपूर्ण घडामोडींमुळे महाराष्ट्राचे राजकारण अधिक रोचक आणि धक्कादायक वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता या ऑफरवर पुढील राजकीय हालचाली काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.