
बच्चू कडूंनी आपल्या खास शैलीत नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरची खिल्ली उडवत राजकीय वादळ निर्माण केले. त्यांच्या बोचऱ्या टोमण्यांनी काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच खळबळ उडवणारे बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत राजकीय वादळ निर्माण केले आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्र्यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्यानंतर बच्चू कडूंनी त्यांना जागेवर बसवण्याचे काम केले आहे. आपल्या मिश्कील आणि बोचऱ्या शैलीत त्यांनी पटोलेंच्या विधानाची खिल्ली उडवत काँग्रेसच्या अस्तित्वावरच मोठा प्रश्नचिन्ह लावला आहे.
बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, नानाभाऊंची ऑफर म्हणजे एक विनोदच आहे. आधी काँग्रेस कुठे आहे ते शोधा, मग ऑफर द्या. त्यांच्या या खोचक टोमण्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. धुलिवंदनाच्या निमित्ताने रंग खेळायचा असतो, पण नाना पटोलेंनी थेट राजकीय रंगांची उधळण सुरू केली आणि तीच रंगपंचमी बच्चू कडूंनी धुवून काढली आहे.

काँग्रेस आधी वाचवा
कडू यांनी पटोलेंच्या वक्तव्याचा समाचार घेताना काँग्रेसच्या सद्यस्थितीवर थेट प्रहार केला. काँग्रेसला स्वतःचं भविष्य ठाऊक नाही, आणि हे थेट मुख्यमंत्रिपदाच्या ऑफर देत सुटले आहेत. 20 आमदारांमध्येच त्यांचा गोंधळ सुरू आहे, एक आमदार तर थेट शिंदे गटात गेले आहेत. स्वतःचं घर सावरण्यात त्यांना रस नाही, पण सत्तेच्या गप्पा मोठ्या करत आहेत, असा जोरदार हल्ला बच्चू कडूंनी केला. यासोबतच त्यांनी भाजपच्या ताकदीचा उल्लेख करत पटोलेंच्या योजनेची चिरफाड केली. जोपर्यंत केंद्रात आणि राज्यात भाजप आहे, तोपर्यंत कुणीही हलणार नाही. कारण ईडीचा धसका सगळ्यांनी घेतलाय. काँग्रेसच्या ऑफरला कुणीही धाडस करून होकार देणार नाही,असे सांगत त्यांनी काँग्रेसची गोची उघड केली.
पटोलेंची उडवली धूळ
नाना पटोलेंनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, भाजपने त्यांच्या पक्षांची वाताहत केली आहे, त्यांच्या योजना थांबवल्या आहेत, ते कोणत्याही क्षणी आमच्या बाजूने येऊ शकतात. मात्र बच्चू कडूंनी त्यांचे हे स्वप्न धुळीस मिळवत, राजकारण ही टरबुजाची साले टाकण्याची जागा नाही असं म्हटलं. काँग्रेसकडे सध्या सत्ता दूरची गोष्ट, पण विरोधी पक्षनेतेपदाचे आकडेही नाहीत. त्यामुळे हे मुख्यमंत्रिपदाचे गाजर दाखवण्याचे खेळ थांबवावेत, असा घणाघात केला.
हास्यास्पद ऑफर
बच्चू कडूंनी आपल्या बिनधास्त शैलीत नाना पटोलेंची मुख्यमंत्रिपदाची ऑफर हास्यास्पद असल्याचे ठणकावले. सत्तेचे स्वप्न पाहायला हरकत नाही, पण त्यासाठी आधी स्वतःच्या पक्षाला उभं करण्याची ताकद असावी लागते. काँग्रेसची स्थिती पाहता, ही ऑफर म्हणजे निव्वळ विनोद आहे. लोकांनी हसावं म्हणून काहीजण अशी विधानं करतात, असे सांगत त्यांनी काँग्रेसवरच ताशेरे ओढले. नाना पटोले यांनी धुलिवंदनाचा मुहूर्त साधत जे रंग उधळले होते, त्यावर बच्चू कडूंनी राजकीय झाडू मारत संपूर्ण चित्र बदलून टाकले आहे. आता पुढे या राजकीय नाट्यात कोणते रंग उधळले जातील, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.