
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर महायुतीतील अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्र्यांच्या खात्यांमध्ये मोठी निधी कपात झाल्याने मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारला थेट इशारा दिला आहे.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र, या अर्थसंकल्पानंतर महायुतीच्या अंतर्गत नाराजी समोर येऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांच्या खात्यांमध्ये मोठी कपात करण्यात आल्याचे दिसून येत आहे, तर काही विभागांना उदारहस्ते निधी वाटप करण्यात आले आहे. यामुळे शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. विशेषतः शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी निधी कपातीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सरकारला थेट इशारा दिला आहे.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “लाडकी बहीण योजना महत्त्वाची आहे, त्यावर कोणतेही दुमत नाही. मात्र, त्यासाठी इतर महत्त्वाच्या खात्यांवर कुऱ्हाड चालवली जाणे योग्य नाही. विकासकामांमध्ये कपात केली, तरीही समजू शकतो, पण सामाजिक न्याय व आदिवासी विकास खात्याला घटनेनुसार मिळणारा निधीही कमी करण्यात आला आहे. हे कदापि मान्य होणार नाही. योजनेनुसार कपात करण्यात आलेल्या निधीची आकडेवारीही त्यांनी दिली. लाडकी बहीण योजना चार हजार कोटी, प्रधानमंत्री आवास योजना एक हजार 500 कोटी, ऊर्जा विभाग एक हजार कोटी. या सर्व योजनांमधून सात हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला आहे, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.

अन्यथा मोठा उद्रेक
संजय शिरसाट म्हणाले, सामाजिक न्याय विभाग हा मागासवर्गीय, दलित, वंचित आणि सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारा महत्त्वाचा विभाग आहे. हा विभाग समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असतो. अशा विभागाच्या निधीत कपात करणे म्हणजे सामाजिक न्यायाच्या संकल्पनेवर घाला घालण्यासारखे आहे. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी या विभागाच्या निधीत कपात केली, तर त्याचा गंभीर परिणाम होईल. अशा प्रकारे अन्याय झाल्यास मोठा उद्रेक होऊ शकतो, असा थेट इशाराही त्यांनी दिला.
शिरसाठ पुढे म्हणाले की, आमच्या खात्यातून पैसे घेताना आमची संमती घ्यायला हवी होती. कायद्याने आम्हाला दिलेले बंधन पाळले पाहिजे. त्यामुळे मी याविरोधात मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांना पत्र लिहून अधिकृत मागणी करणार आहे,” असेही संजय शिरसाअट यांनी स्पष्ट सांगितले.
Atul Londhe : भाजपने गमावला विश्वास; काँग्रेस हाच एकमेव पर्याय
औरंगजेबाच्या कबरेवर संतप्त
संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे. ही कबर हटवण्याची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे. यावरही संजय शिरसाट यांनी आपली भूमिका स्पष्ट करत थेट शब्दांत प्रतिक्रिया दिली. आमच्या शिवसेना पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. औरंगजेबाची कबर येथे नकोच! त्याची गरजच काय? तो इथे येऊन हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करतो. महिला भगिनींवर अत्याचार करतो, छत्रपती संभाजी महाराजांना अमानुष छळ करून मारतो, मग त्याची आठवण ठेवायची गरज काय? अशी नफरतची निशाणी महाराष्ट्रात ठेवायचीच कशाला?” असा रोखठोक सवाल शिरसाट यांनी केला. हिंदूंच्या अस्मितेचा अपमान करणाऱ्या कोणत्याही गोष्टींना येथे स्थान असू नये. औरंगजेबाची कबर हटवलीच पाहिजे, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
अर्थसंकल्पानंतर महायुतीतील मतभेद अधिकाधिक चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. निधी वाटपावरून शिंदे गटातील मंत्री नाराज असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. आगामी काळात या मुद्द्यावर सरकारमध्ये मोठी खदखद निर्माण होऊ शकते. संजय शिरसाट यांची थेट भूमिका आणि सरकारला दिलेला इशारा पाहता, महायुतीतील अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.