
दिशा सालियन मृत्यूप्रकरणावर भाजप नेते नितेश राणे आक्रमक झाले आहेत. त्यांनी आदित्य ठाकरेंवर थेट आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर भाजप नेते नितेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत शिवसेनेवर आणि खासकरून आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिशाच्या वडिलांनी न्यायालयात क्रिमिनल याचिका दाखल करत थेट गंभीर आरोप केल्यानंतर आता हे प्रकरण आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत.
नितेश राणे यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांना सत्य बाहेर आणण्याचे आव्हान दिले आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगत आलो आहे की दिशा सालियनची हत्या झाली आहे. या प्रकरणात काही मोठी नावे गुंतलेली आहेत, पण त्यांना वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न झाले. मी आधीच म्हटलं होतं की आठ जूनचे आदित्य ठाकरेंचे मोबाईल टॉवर लोकेशन्स तपासा, वॉचमनला काय झालं याचा शोध घ्या. पण त्याऐवजी सत्य दडपण्याचा कट आखला गेला,” असा गंभीर आरोप राणे यांनी केला.

मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा बचाव
राणे यांनी स्पष्ट शब्दांत ठाकरेंवर निशाणा साधत म्हटलं की, त्या काळातील मुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणि पोलीस प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले. दिशा सालियनच्या वडिलांनी आता जे सत्य सांगितलं आहे, ते मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो. पण मला आणि माझ्या सहकाऱ्यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न झाला. आता त्याच गोष्टींवर दिशाच्या वडिलांनी शिक्कामोर्तब केला आहे. आता काय करणार ते लोक, ज्यांनी आम्हाला खोटं ठरवायचा प्रयत्न केला? कुठल्या तोंडाने हे लोक आता बोलणार? किती दिवस हे सत्य लपवणार?” असा संताप व्यक्त करत राणे यांनी या प्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
राणे यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल करताना शिवसेनेतील इतर नेत्यांनाही लक्ष्य केले. जे इतरांवर खोटे बलात्काराचे आणि खुनाचे आरोप लावत होते, त्यांनी आधी आपल्या घरातील शक्ती कपूरला सावरावं. या लोकांनी दिशाच्या बाबतीत जे केलं, ते आता लोकांसमोर येत आहे. पोलिस चौकशी काय असते, ती आता त्यांना कळेलच, असा थेट इशारा राणे यांनी दिला.
सत्य दडपणार नाही
राणे यांनी ठाम भूमिका घेत या प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. ही एक बिचारी मुलगी होती, जी आपल्या स्वप्नांसाठी मुंबईत आली होती. पण काही भेकड आणि क्रूर लोकांनी तिचा बलात्कार केला, तिचं आयुष्य संपवलं. तिच्या मृत्यूनंतर सत्य बाहेर येऊ नये म्हणून कट रचला गेला. पण आता दिशाच्या वडिलांनी हे प्रकरण उघड केलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेने आता जागरूक राहून दिशाच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. मी या लढाईत शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी राहणार, असा ठाम निर्धार नितेश राणे यांनी व्यक्त केला. हे प्रकरण आता राजकीय संघर्षाचं केंद्रबिंदू बनलं आहे. या आरोपांमुळे महाराष्ट्रातील वातावरण अधिकच तापले आहे, आणि लवकरच मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.