महाराष्ट्र

Nana Patole : संघर्ष करणाऱ्या घटकांसाठी काँग्रेसचा ठाम पाठिंबा

Congress : नाना पटोले यांच्या समर्थनाने लढ्याला गती

Author

आझाद मैदानावरील विविध आंदोलनांना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भेट देत ठाम पाठिंबा दर्शविला. महिला परिचारिका, शिक्षक आणि मच्छीमारांच्या मागण्यांसाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तातडीने पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या विविध आंदोलनांना काँग्रेसचे नाना पटोले यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शविला. महिला परिचारी संघटना, महाराष्ट्र राज्य अंशतः अनुदानित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समिती यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारत त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची आणि लवकरात लवकर योग्य तोडगा काढण्याची ग्वाही त्यांनी दिली.

महिला परिचारी संघटना आपले हक्क आणि योग्य सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांच्या सेवा अटी, वेतनश्रेणी आणि इतर सुविधांबाबत सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. नाना पटोले यांनी या मागण्यांची दखल घेत लढ्याला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्य अंशतः अनुदानित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनाही गेल्या काही काळापासून सरकारी लाभ आणि वेतन संबंधित मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. त्यांच्या उपोषणाला भेट देत नाना पटोले यांनी शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी काँग्रेस सरकारदरबारी ठामपणे उभे राहील, असे आश्वासन दिले.

Nitesh Rane : पोलिसांना झोपेची गोळी कोणी दिली

मागण्यांचा पाठपुरावा

महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीने मोठ्या संख्येने एकत्र येत आपले आंदोलन सुरू केले आहे. सागरी व्यवसायाशी संबंधित धोरणांमध्ये सुधारणा आणि आर्थिक मदतीसाठी या संघटनेने सरकारकडे मागणी केली. नाना पटोले यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत, मच्छीमार समुदायाच्या हक्कांसाठी संघर्ष करणार असल्याचे सांगितले. आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर नाना पटोले यांनी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करून योग्य निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सामाजिक अन्यायाविरोधात आणि कामगार, शिक्षक, परिचारिका व मच्छीमार समुदायाच्या हितासाठी सतत लढत राहील, हे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.

नाना पटोले यांच्या भेटीमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, सरकारवर अधिक दबाव टाकण्यासाठी काँग्रेस आक्रमक भूमिका घेणार आहे. विविध घटकांच्या न्याय्य मागण्यांसाठी सत्ताधाऱ्यांना जाब विचारत काँग्रेस लोकशाही मार्गाने लढा उभारणार आहे. जनतेशी थेट संवाद साधण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेचा एक भाग म्हणून हा दौरा महत्त्वाचा ठरत आहे. नाना पटोले यांच्या सक्रिय सहभागामुळे आंदोलकांच्या मागण्यांना राजकीय पाठबळ मिळाले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे महिला परिचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि मच्छीमार समुदायाच्या समस्यांना सकारात्मक दिशा मिळेल. राज्यभरातील संघर्ष करणाऱ्या घटकांसाठी ही घटना एक सकारात्मक पाऊल असून, लवकरच आंदोलनकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ठोस निर्णय घेतला जाणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!